नरेंद्रजी

१) एकानी एकाचा केला तर खून आणि लाखोंनी लाखोंना मारले तर युद्ध ही माणसाची बुद्धीमत्ता आहे. कुणीही कुणाला कशासाठीही मारणं हा एकच गुन्हा आहे आपण त्याला फक्त नांव (धर्मयुद्ध वगैरे) देतो. पण माणसाची हीच मजा आहे भाषाही त्यानीच निर्माण केली आणि तीच तो हेतू लपवण्यासाठीही वापरतो.  तुम्ही हेतू बघा, युद्धाला प्रोत्साहन देऊन आपण काय साधतोय? युद्ध करण्यात कसला आलाय कर्मयोग? कुणी तरी म्हंटलय की जेते इतिहास लिहीतात त्यामुळे हिटलर जिंकला असता तर लोकांनी त्याची वाहव्वा केली असती. तुम्ही शब्दांना भूलू नका, संस्कृत असलं म्हणून काय झालं, हेतू बघा मग तुम्हाला सल्ल्याची व्यर्थता लक्षात येईल.

२) धर्म या शब्दाचे तर वाट्टेल ते आणि वाटेल तसे अर्थ लोकांनी लावले आहेत. धर्म म्हणजे तुम्हाला स्वतःप्रत आणणारी प्रक्रिया, तुम्ही ज्यात रमू शकाल तो स्वच्छंद! युद्ध कोणाला आणि कसे स्वतःप्रत आणेल? कारण युद्धात तुमच्या जाणिवेचा अनुरोध दुसऱ्यावर आहे आणि मनात वैर आहे. तुम्हाला स्वधर्माचं उत्तम उदाहरण हवं असेल तर संगीत घ्या, जर तुम्हाला संगीताची आवड असेल आणि तुम्ही संगीत शिकलात तर कोणत्याही उत्कट क्षणी(म्हणजे मन संपूर्ण एकाग्र झाल्यावर), तुमच्या जाणिवेतून सगळं जग नाहीसं होईल. तुम्हाला आपण गात नसून आपण गायकाच्या अवतीभवती आहोत असा बोध होईल, झालात तुम्ही शरीर आणि मनापासून वेगळे, झालात तुम्ही मुक्त! युद्ध कशाला हवयं?

संजय