मनोगतावर  झालेल्या या संवादाचे माझ्या अल्पबुद्धीने काढलेले निष्कर्ष प्रस्ताव स्वरूपात चर्चेसाठी मांडत आहे.

१. टाडा की पोटा या कायद्यात सुधारणा करून भगवद्गीता या दहशतवाद समर्थक, युद्धखोर आणि चिथावणीबाज  ग्रंथावर बंदी घालावी. बर्याच जणांचे वैचारिक गोंधळ, कित्येकांना येणारे खजीलपण/ लाजीरवाणेपणा दूर होईल. लोकांची उत्पादनक्षमता कमालीची वाढून भरभराट होईल. लोक पत्ते खेळतील, चहा घेतील, गाणी गातील. हिंसाचाराचा समूळ नाश होऊन सर्वत्र अपार शांतीचे साम्राज्य येईल. 'बसून राहा, सारे मिळालेलेच आहे' असे सांगणारा ताओ तेह चिंग हा राष्ट्रीय ग्रंथ करावा. उगाच का काहीबाही करायला जा, घोटाळ्यात पडा आणि आपल्याला समज नाही हे जगजाहीर करा?

२. हिंसाचार कुठलेही लेबल लाऊन केला तरी निंदनीयच. अतिरेक्यांशी लढलेले जवान, सियाचेन आणि कारगिल मध्ये हिंसक कृत्ये केलेले जवान यांच्यावर किमान सदोष मनुष्यवधाचे खटले होतील असे पाहावे. शिक्षा हिंसक नसावी. रोज दहा कप चहा घेणे, सलग चार तास पत्ते खेळणे, जे. कृष्णमूर्ती आणि एकहार्ट टोले यांची सुगम्य आणि रसाळ प्रवचने सलग दोन तास ऐकणे आणि २४ तास निराकाराचे अनुसंधान अशी असावी.  

3. सुरक्षा दले या गुंडांच्या टोळ्या आहेत. उगाच त्या आपल्या म्हणून उदात्तीकरण करू नये. त्या बरखास्त करून एन एस जी भजनी मंडळ, ए टी एस ब्यांड अशा संगीत मंडळीची स्थापना करावी. धर्मयुद्ध असा काही प्रकार नसतोच. आजवर झालेला नाही. असतो तो गुंड टोळ्यामधील स्वार्थी संघर्ष. उद्या चीन ने दिल्ली आमची असा दावा केला, कसब चे भाऊबंद पुन्हा मुंबईत आले, तर सुरक्षा दलांनी भावविभोर होऊन नाचावे, तल्लीन होऊन गावे. विदेही मुक्तीची अनुभूती येईल, आणि ओघानेच देह बंधनातून मुक्ती मिळाल्यावर निराकार पुरता गवसेल.  

४. गीता या तर्कदुष्ट, हिंसक, अवैज्ञानिक आणि विस्कळीत ग्रंथाचे वारेमाप कौतुक करणाऱ्या आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव ते पारनेरकर महाराज सर्वांची ग्रंथसंपदा ओशो कम्यून मागील नाल्यात बुडवावी. याला काव्यात्म न्याय असे म्हणतात. अहो, संस्कृत मध्ये लिहिले आणि खंडीभर विद्वानांनी एकमुखाने सांगितले म्हणून का काही सत्य होते? भिंत बघून कुत्र्याने पाय वर करावा, आणि निर्माण होणार्या आकृतीत यांना मोनालिसा चा चेहेरा दिसावा असली ही फसवी विद्वत्ता. खरी समज हि लाखोमध्ये एखाद्या ज्ञानियाला असते. त्याची मान्यता हे प्रमाण नाही का? बाकी दुधखुळे असतात. त्यांना समज द्यावी, वा दुर्लक्ष करावे हे उत्तम.