माझ्या एका छोट्याशा शंकेवर इतके रान उठावे हे अपेक्षित नव्हते.
मूळ प्रश्नाबद्दल-
विनायक यांचा प्रतिसाद मूळ प्रश्नापुरता मर्यादित आणि बिंदूगामी होता.
ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत गीतेचा भावार्थ समजावून सांगितला आहे.
'तसा युक्तीवाद केला तर' वरील प्रश्नातील दोन श्लोकांमधला विरोधाभास काहीसा कमी होतो.
पण त्यामुळे भग्वद्गीतेत प्रत्यक्षात जे सांगितले आहे त्याचे मंडन होत नाही - काहीसे खंडनच होते.
मूळ लेखक यशवंत जोशी यांच्याकडून काही मार्गदर्शनाची अपेक्षा होती.
चर्चेच्या अनुषंगाने -
त्याकाळी अस्तित्वात असलेल्या विविध (कदाचित परस्परविरोधी) विचारप्रणाल्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न व्यासमुनींनी भारताद्वारे आणि त्यातल्या गीतेद्वारे केला असे म्या पामराचे प्रामाणिक मत आहे. या प्रयत्नात नंतरच्या काळात भर पडली. १८००० श्लोकांचे भारत जवळजवळ दीड लाख श्लोकांचे महाभारत झाले. तशीच वाढ गीतेतल्या श्लोकांमध्ये झाली असावी. (~प्रक्षिप्त श्लोक- मृदुला) ही वाढ होत असता त्यातील वैचारिक मांडणीत दोष आले असावेत. त्यामुळेच असे परस्परविरोधी विचार दहाच श्लोकांच्या अंतराने दिसतात.
गीतेतले तत्त्वज्ञान 'महान', 'जीवनाभिमुख', 'सर्वसमावेषक','वैश्विक' आहे की नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. अनेक महात्म्यांनी, जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी गीतेवर दृढ विश्वास दाखवला हेही नाकारता येत नाही. पण त्यामुळे आपणही डोळे मिटून तसेच करावे असे नाही. याउलट असे दोष दिसल्याने गीतेचा प्रचार - प्रसार करताना डिफेन्सिव्ह (किंवा आग्रही ऑफेन्सिव्ह) व्हावे लागते, हे दोष काढता आले तर बरे, तसा प्रयत्न व्हावा असे म्हटले तर ते वावगे नाही.
गीतेतला 'युद्ध कर' हा उपदेश प्रत्यक्ष रितीने अर्जुनाला आणि अप्रत्यक्ष रितीने सामान्य वाचकाला आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यात दोन भाग आहेत-
१. कर्तव्यकर्म करताना - कसलीही दया-माया, पुढे काय होईल? अशा शंका-कुशंका, यश-अपयश यांचा विचार इ. इ. - यांमुळे प्रत्यक्ष कृतीतील एकाग्रतेमध्ये - कौशल्यामध्ये (योगामध्ये!) कमतरता येऊ शकते.त्यामुळे कार्याची हानी होते. ती टाळण्यासाठी काय केले पाहिजे ते (वेगवेगळ्या मार्गांनी) गीतेत सांगितले आहे. इतकेच काय? पण गर्भितार्थ असाही आहे की कोणत्याही विचारधारेने गेलेतरी कर्तव्यात/कृतीत बदल होत नाही.(दूरान्वये पाहिले तर कोणतीही व्यापक विचारधारा आणि व्यक्तीगत कर्तव्यकर्म यांच्यात काहीच संबंध नाही. हे खरेच आहे.)
२. प्रत्यक्ष गीता कधी लिहिली गेली हा संशोधनाचा विषय आहे. जर ती गौतम बुद्धानंतर लिहिली गेली असेल तर बौद्ध तत्त्वज्ञानामुळे समाजात भिनलेली अतिरेकी अहिंसा (आणि तिचे दुष्परिणाम) नष्ट व्हावी म्हणून, क्षत्रियांनी पुन्हा युद्धमान व्हावे - त्या हिंसेला नैतिकतेचा, तत्त्वज्ञानाचा पाया मिळावा म्हणून युद्धाचा पुरस्कार केला गेलेला असू शकेल.हा कयास आहे.
त्याकाळी असलेले सामाजिक नैतिकतेचे/कायद्याचे/समाजाचे मापदंड आणि आजचे मापदंड वेगळे आहेत. त्यामुळे कधीकाळी
लिहिले गेलेले (धर्म?)ग्रंथ आजही तसेच स्विकारले पाहिजेत असे नव्हे. आजच्या मापदंडाप्रमाणे त्यांवर विचार व्हायला हवा.
(तसा तो प्रत्येक काळात व्हायला हवा. )
मग त्यात सर्वच ग्रंथ आले - गीता, बायबल, कुराण इ. इ.
जे ग्राह्य आहे ते ठेवले पाहिजे, जे त्याज्य आहे ते टाकले पाहिजे. यात गळ्याच्या शिरा ताणून वाद घालण्याची किंवा गुळमुळीत शब्द वापरून तोंडाला पाने पुसण्याची किंवा प्रश्न विचारण्याच्या योग्यतेबद्दल शंका घेण्याची गरज नाही - इतकेच!