संजय जी, मान्य आहे. डिटेल्स मध्ये न जाता आपली भूमिका थोडी विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न आधी करतो.
एखाद्या मान्यताप्राप्त ग्रंथाबद्दल लोक भावूक होणं सहाजिक आहे - खरे आहे. एखाद्या धर्म, पंथाच्या भावना दुखावल्या म्हणून जीव मुठीत घेउन अज्ञातवासात जीवन कंठणारे लेखक याच भूतलावर आहेत ना? विचाराचे विचाराने उत्तर न देता हुल्लडबाजी, दंगा, हल्लाबोल या घटना देखील आपल्या आजूबाजूलाच नित्य घडतात ना? दहशत ही अशी काम करते. मी ज्या जगात राहतो, वावरतो तिथे व्यवहाराच्या पातळीवर अद्वैत नाही. सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष अव्याहत सुरू असलेला दिसतो. आततायी, आक्रमक, कट्टर प्रव्रुत्ती आणि त्या विरुद्ध प्रतिकार करण्यासठी संघटन करणारे यात माझ्या सामान्य बुद्धिला तरी स्पष्ट फरक दिसतो. 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे' असे म्हणणारे समर्थ आणि लादेन नि दिलेल्या धमक्या यातही एखाद्याला शब्दसाम्य दिसेल. त्या पलीकडे जाउन शब्दामागचा हेतू, परिस्थिती लक्षात न घेता दोन्ही सारखेच असे म्हणणे ही निष्पक्ष विचारसरणी आहे, की बौद्धिक दिवाळखोरी?
गीतेसारख्या ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दांचा किस न पाडता, तथाकथित विसंगतीनाच कवटाळून तिथेच न थांबता साक्षेपाने, साकल्याने विचार करण्याचा यथाशक्ति यथामति प्रयत्न मी करतो. माझ्या काही श्रद्धा आहेत. काही बांधिलकी आहे. मी सर्वसामान्य माणूस आहे हे वारन्वार सांगत आलोच आहे. आपली एखादी श्रद्धा दुखावली गेली म्हणून मन सैरभैर व्हावे, अगतिक वाटावे किन्वा उपहासात्मक लिखाण व्हावे या माझ्या व्यक्तिगत मर्यादा आहेत आणि मी त्या मान्यच करतो आहे. उपहास वगळता, तुम्ही मांडता ती भूमिका वरपांगी तर्कशुद्ध वाटली तरी ती व्यवहाराच्या पातळीवर उतरू शकत नाही. एकांगी मांडणी, सदोष विचारपद्धती, सबगोलंकारपणा, या गोष्टी तिथे येतात हे ही मी दाखवून दिले आहे. उपहास हा मार्ग चूक असेल, पण तुम्हीही उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही. उदा. कुरुक्षेत्रीचा समरप्रसंग तुम्हाला फक्त दोन घराण्यातला सत्तासंघर्ष वाटतो. गर्भावर ब्रह्मास्त्र वापरण्याइतका निर्दयी असलेला अश्वत्थामा, कोवळ्या वयातल्या अभिमन्यूचा क्रुरपणे घात करणारे - द्रौपदीच्या विटंबनेचा विकृत आनंद लुटणारे कौरव पुर्या सामर्थ्यानिशी युद्धाला सामोरे ठाकले असताना अर्जुनाने पळून जायचे होते? श्रीहरिने भजन शांतिपाठ गायचा होता? सारथी म्हणून त्याचे हे कर्तव्य होते? युद्धासारखा बाका प्रसंग समोर उभा असताना, ऐनवेळी कच खाउन गर्भगळीत झालेल्या शिष्योत्तमाची परोपरीने समजूत घालणार्या स्थितप्रज्ञ श्र्रीहरिने तशा प्रसंगात एक मूल्यवान, लवचिक, मार्गदर्शक तत्त्वज्ञान मांडले. हे युद्धखोर, अडाणी, समज कमी असलेल्या माणसाचे लक्षण आहे? तुम्हाला हे भावूक भक्ताचे तर्कहीन प्रलाप वाटतील. मला तरी निरंतर युद्धसज्जता आणि अटळ असल्यास युद्ध करणे याला पर्याय व्यवहारी वस्तुस्थिती भारताचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आजही दिसत नाही.
निवांतपणे बसून केलेल्या तत्त्वविचाराना, कल्पनाविलासाना वेगळीच उंची असते, तुलनेने जास्ती तर्कशुद्धता असते. ते कागदावर सिद्ध होतात ही मर्यादा येते. गीता मांडते ते तत्त्वज्ञान तिथेच थांबत नाही. अमूर्त संकल्पनांच्या कल्पनाविलासात दंग राहून व्यक्तिगत पातळीवर तणावमुक्त, सहजावस्था मिळवा इथेच अडकून राहत नाही. जगाचा व्यापार कसा चालतो, तिथे जे व्यवहारी द्वैत असते त्याला कसे सामोरे जावे हे मार्गदर्शन देखील करते. मनोगताचा उद्देश आस्वाद, सम्वाद, विवाद असा आहे. एखाद्याचे विचार रूचले नाहीत, पचले नाहीत तर विवाद व्यक्त होणे, आणि अभिव्यक्तीमध्ये व्यक्तीपरत्वे फरक पडणे ओघानेच येते. माझी बुद्धीमत्ता दाखवणे, प्रगल्भतेचे प्रदर्शन करणे असा माझा हेतू कधीच नव्हता. माझी भूमिका मी निष्ठेने मांडतो आहे, त्या पायी शिव्या मिळाल्या, ओव्या मिळाल्या, अपमान झाला, व्यक्तिगत मर्यादा उघड झाल्या तरी माझ्यासाठी हा एक लर्निंग एक्स्पिरियन्स च आहे. लेखन करणे या बाबतीत मी नवोदितच आहे. विचार मांडताना माझ्याकडून काही उपहासत्मक लिखाण झाले, कटू उद्गार निघाले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.