१) सारे अस्तित्व एक आहे हा अध्यात्माचा मूलभूत आधार आहे. अस्तित्वात वैर नाही, वैर व्यक्तिगत आहे. कुणाही ज्ञानी पुरुषाला हे समजले असलेच पाहिजे. ही गोष्ट इतकी उघड असताना सगळ्यांना युद्धात लोटणे, मुख्य योद्धा की जो लढला नाही तर युद्ध होऊ शकत नाही त्याला युद्धाला प्रवृत्त करणे कसे योग्य ठरते?
२) आत्मा, सत्य, शून्य किंवा निराकार हा सगळ्या प्रकट जगाचा आधार आहे हा बोध हे अध्यात्माचे इप्सित आहे, प्रत्येक आकार हा मूळात निराकार आहे ही अध्यात्माची सर्वोच्य संहिता आहे. दुसऱ्या अध्यायात केवळ आत्म्याची लक्षणं आणि ज्याला बोध झाला आहे त्याची वैशिष्ट्य आहेत. ज्याला बोध झाला त्याला तत्क्षणी हे पण कळते की दुसरा जरी स्वतःला व्यक्ती समजत असला तरी तो ही मूळात निराकार आहे, ही खरी सहिष्णुता आहे. अख्या ग्रंथात कुठेही अर्जुनाला तू निराकार आहेस, नित्य आहेस असे म्हंटलेले नाही, त्यामुळे ग्रंथ वाचाणारा देखील आत्मा ही काही तरी दुष्प्राप्य गोष्ट आहे आणि आपण ज्ञानी नसून कृष्ण हा एकमेव ज्ञानी पुरुष आहे असेच समजत रहातो. सत्य हा या अस्तित्वाचा स्वभाव आहे त्यामुळे इथला प्रत्येकजण ज्ञानोपलब्ध आहे, अमर आहे, नित्य आहे.
आता अशी वस्तुस्थिती असताना 'आत्मा अमर आहे तू युद्ध कर' हा उपदेश कसा सार्थ होऊ शकेल?
३) किती हुशार लोकांनी काय अर्थ लावलेत आणि त्यांनी किती महान कार्य केलं आहे त्यांचा वकूब काय होता हा विषय इथे अप्रस्तुत आहे. मला तुम्ही गीतेतला फक्त एक श्लोक सत्य शोधणाऱ्याला मार्गदर्शक ठरेल म्हणजे 'तू सत्य आहेस असा बोध प्राप्त करून देईल' असा दाखवा. उदाहरण म्हणून मी इशावस्य उपनिषदातला श्लोक देतो: 'पूर्णं इदं, पूर्णं अदाः पूर्णात पूर्ण उदिच्यते, पूर्णात पूर्ण अदायस्य पूर्णंमेव अवशिष्यते'. हा श्लोक जसा साधकाला दिलासा देतो तसा अर्जुनाच्या भ्रांत्त चित्त दशेला (आणि पर्यायानी जगातल्या कोणत्याही साधकाला) दिलासा देणारा फक्त 'एक' श्लोक दाखवा.
४) स्वधर्म याचा अर्थ व्यक्तीचा मानसिक कल कारण विचार थांबल्या शिवाय आत्मबोध (म्हणजे वैश्विक शांतता जी आत्ता, या क्षणी सर्वांना अनुभवाला उपलब्ध आहे तिची जाणिव) दुरापस्त आहे. त्यामुळे साधना सांगताना ती व्यक्ती कशात रमेल हे पाहणे अगत्याचे ठरते. युद्धात मनात वैर आणि जाणिवेचा रोख दुसऱ्यावर असताना स्वधर्म कसा गवसेल? थोडक्यात तुम्ही मूळातच शांत आहात हे समजणे कसे शक्य आहे?
५) कर्मयोगाचा अर्थ कर्मातून जो निष्काम आहे, जो कधीही काहीही करत नाही (म्हणजेच निराकार किंवा अवकाश ज्यात कर्म घडतं आहे) त्याचा वेध घेणं असा आहे. मूळ उद्देश हा निष्कामाचा वेध घेणं असल्यामुळे सगळी कर्म सारखीच आहेत.
कर्मयोगाचा या पेक्षा वेगळा अध्यात्मिक अर्थ कुणीही सांगून दाखवावा. असे असताना युद्ध हा कर्मयोग कसा होईल?
६) युद्ध जिंकून देखील प्रश्न सुटला का? किमान अर्जुनाला आत्मबोध झाला का? असे असेल तर इतक्या संहाराचा काय उपयोग झाला?
मी तुम्हाला अत्यंत उत्कृष्ठ उदाहरण देतो. अष्टावक्रानी जनक राजाला केलेला उपदेश 'अष्टावक्र गीता' म्हणून ओळखला जातो. ज्या बुद्धीमत्तेच्या स्तरावर अष्टावक्र बोलले आहेत त्याच स्तरावर ज्या क्षणी आत्मबोध होतो त्या क्षणी जनक बोलू लागतो. याला म्हणतात उपदेश, गीतेतून अर्जुनाला काय मिळालं? (आणि त्यालाच काही मिळालं नाही तर इतरांना काय मार्गदर्शन मिळेल?)
७) आता शेवटचं, आत्मबोध ही वैयक्तिक उपलब्धी आहे त्यामुळे मला कुणाचे दाखले द्यावे लागत नाहीत पण एखादे वाक्य किंवा संदर्भ मी जिथून घेतले आहे ते तसे नमूद करणे हा मी प्रामाणिकपणा आणि जवाबदारी समजतो पण मी जे लिहीतो तो नेहेमी माझा वैयक्तीक अनुभव असतो. मला तुम्ही ओशो, एकहर्ट, कृष्णमूर्ती, निसर्गदत्त किंवा कुणाचाही फॉलोअर मानून त्या अनुरोधानी मला समजले नाही किंवा त्यांच्या व्यक्तीगत जीवनातले दाखले देऊन मला त्याच्याशी जोडणं हा तुम्ही बेभान झाला आहात याचा पुरावा आहे, त्याचा माझ्या दृष्टीनी न तुम्हाला उपयोग न मला. मी जे लिहीतो त्याचे तुम्ही खंडन करून दाखवा, इथून पुढे मी तुमच्या कडून उपदेश घेइन.
संजय