१. मी राहतो त्या जगात फक्त व्यक्ती नाहीत. समाज आहे, राष्ट्र आहे. हे लक्षात घेता काही न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी युद्ध करावेच लागू नये अशी परिस्थिती व्यवहारी जगात मुळीच नाही. मला माहित असलेल्या मानवी इतिहासात कधीही नव्हती. आपण 'अस्तित्वात' राहा. मला भारतात राहण्यात कमीपणा वाटत नाही. मी अस्तित्वात राहत नाही. मी भारताचा सामान्य नागरिक आहे. मुख्य योद्धा लढला नसता तर युद्ध टळले असते हा भोंगळ कल्पनाविलास आहे. प्रतिकार न करताच अर्जुनाची खांडोळी झाली असती हा वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा कल्पनाविलास आहे. सामोपचाराचे सारे मार्ग खुंटल्यावर हे युद्ध झाले असा इतिहास मी वाचला आहे, म्हणून मी त्याला युद्धात लोटणे असे समजत नाही. चूक असेल तर पुरावे द्या. सुधारणा करून घेता येईल.
२. "ज्याला बोध झाला त्याला तत्क्षणी हे पण कळते की दुसरा जरी स्वतःला व्यक्ती समजत असला तरी तो ही मूळात निराकार आहे" - हे महान तत्व आहे हे कोण अमान्य करेल? अशा उदात्त, अमूर्त संकल्पना अध्यात्मात समाविष्ट असतात. शिवाय व्यवहारी जगाचा विचारही असतो. म्हणूनच सबगोलंकार वृत्तीने आपल्या न्याय्य हक्कांवर पाणी सोडणे व्यवहार्य ठरत नाही. निराकाराचा बोध झालेली व्यक्ती तिने न्याय्य मार्गाने मिळवलेली संपत्ती कुणी हिसकावून घेत असताना, अन्याय होत असताना, समोर एखादा बलात्कार होत असताना प्रतिकार करेलच की नाही? की तत्वविचार करत किडा मुंगीसारखी मरेल? या बाबतीत प्राप्त परिस्थितीनुसार वागणे टाळता येणार आहे का? असल्यास सांगा. सुधारणा करता येईल. शक्य असेल तोवर सामोपचारानेच वागावे, हौस म्हणून हिंसा करू नये. मात्र व्यवहारी जगात वावरत असल्याने आपले संरक्षण करण्यास सज्ज राहावे ही युद्धखोरी नाही. इथेच सहिष्णू असणे आणि अव्यवहार्य पद्धतीने अहिंसक असणे हा फरक स्पष्ट होतो. अध्याय ४-५ मध्ये भगवंत स्पष्ट सांगतात की तुझे आणि माझेही अनेक जन्म होऊन गेले. फक्त मला त्यांची जाणीव आहे, तुला नाही. याचाच अर्थ तू नित्य आहेस असा होतो. २-३० मध्ये प्रत्येक 'देही' मध्ये शाश्वत, निर्गुण आणि निराकार आत्मा आहे असे स्पष्ट सांगितले आहे. याला अर्जुन अपवाद आहे असे कुठेही सांगितले नाही. चूक असल्यास अवश्य दाखवून द्या. या आत्म्याला 'देही' अवस्थेत काही जीवितकार्य असते. गीता तत्वज्ञानानुसार ते वर्ण (जातपात नव्हे, नाहीतर विषय आणखी भलतीकडे जायचा! ) आणि आश्रम यानुसार ठरते. समाजाच्या निकोप धारणेसाठी ते आवश्यक असते आणि ते काय याची माहिती गीतेत आहेच. हे लक्षात घेता आत्मा म्हणून अमर असलेल्या क्षत्रियाने जीवितकार्य म्हणून युद्ध करावे हे पंडित भीमसेन जोशी यांनी गात राहावे इतकेच सयुक्तिक ठरते आणि सार्थच आहे. व्यवहारी जगात फक्त तर्क(ट)तीर्थ/ विद्वान, व्यापारी/ शेतकरी, लढवय्ये किंवा सेवाभावाने कार्य करणारे यावर निकोप समाजाची धारणा होऊच शकत नाही हे चूक आहे का? मुंग्यांमध्ये पण राणी मुंगी, लष्करी मुंग्या आणि कामकरी मुंग्या असतात. हाच निसर्ग आहे, भोंगळ कल्पनाविलास नाही.
३. अध्याय १८ - ६४ - तू ची भारता बहू आवडता हितार्थ कथितो उघड| ऐक पुन्हा मद्वचन परम ते जे गूढातील गूढ||
आणखी काय दिलासा हवा? गीतेचा उद्देश पार्थाला कर्तव्यसन्मुख करणे असा होता. तणाव मुक्ती, तणावाचे नियोजन असा मुळातच नव्हता हे नमूद करू इच्छितो.
४. ज्याचा जसा पिंड त्या अनुकूल साधना सांगावी हे अगदी बरोबर आहे. अनेकविध मार्गांचे तथाकथित गोंधळ निर्माण करणारे वर्णन त्यापायीच निर्माण झाले आहे. विपरीत गोष्टीत माणूस फारसा रमत नाही आणि जुलुमाने/ नाईलाज असल्याने विपरीत कर्म करायला गेला तर फारसा यशस्वी वा सुखी होत नाही हे मान्यच. म्हणूनच कौशी कानडा सारख्या रागाचे पदर उलगडताना जसराजजीना जी तल्लीनता प्राप्त होते, नवे प्रयोग करताना एडिसनला जी समग्र तल्लीनता, निर्विचार अवस्था प्राप्त तीच कारगिल मध्ये चढाई कशी करावी याचे नियोजन करणाऱ्या सेनानीला आणि तिथे प्राणपणाने झुंजणाऱ्या जवानाला प्राप्त होत असते. बरेच लोक लष्करात आपल्या इच्छेने जातात. सक्तीचा मामला नसतो. सीमेवर लढणाऱ्या माझ्या मामेभावाचे अनुभव ऐकताना आपण मैफिल कशी जिंकली हे सांगणार्या कलाकाराचेच भाव मला दिसले. क्षात्रधर्म असणाऱ्या व्यक्ती जन्मणे ही वस्तुस्थिती आहे. तो पिंड घेऊन जन्मलेली व्यक्ती अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगात शांतच असते, स्वरूपी स्थिर असते आणि आनंदाने आव्हानाला सामोरी जाते. उलट जसराजजी प्रयोगशाळेत आणि एखादा सेनानी ख्याल गाण्यात न रमणे, वा त्याला ती शिक्षा वाटणे ही शक्य आहे. युद्धात स्वधर्म गवसणे शक्य आहे. तसा पिंड नसणार्याला ते दुरापास्त वाटणे साहजिक आहे. युद्ध वैर म्हणून करता येते, आणि कर्तव्य निभावणे म्हणूनही. समोर स्वजन उभे आहेत, वैर म्हणून युद्ध करायला नाकारणारा अर्जुन कर्तव्य निभावणे म्हणून युद्धाला तयार झाला हीच तर गीतेची एक महत्वाची फलश्रुती आहे!
५. कर्म हा मोठा व्यापक विचार आहे. त्यात अगदी नित्य, नैमित्तिक कर्मे देखील येतात. सगळी कर्मे सारख्याच महत्तेची आहेत. यात शेतकरी येतात, कामगार येतात, सुरक्षा दलात काम करणारेही येतात. कर्म कर्तव्यपूर्तीचा एक मार्गही आहे. आपण अधिभौतिक जगात राहतो. (अध्यात्मिक चिदाकाशात नव्हे! ). काही सामाजिक व्यवस्था आहे म्हणून तलफ आली की आसाम मध्ये होणारा चहा मला टपरी वर मिळू शकतो, आणि मी आणि माझे कुटुंब सुरक्षित आहोत हे स्पष्टच आहे. इथे माझ्या कुटुंबाच्या भरण पोषणासाठी काही कर्तव्य कर्म करणे (नोकरी) मला क्रमप्राप्त असते. शिवाय ज्या समाजाचा, राष्ट्राचा मी घटक आहे त्याच्या प्रती दायित्य म्हणून नियमानुसार प्रामाणिकपणे कर भरणे हे माझे कर्तव्य कर्म ठरते. व्यवहारी वस्तुस्थिती लक्षात घेता माझ्या राष्ट्रासाठी सुरक्षा प्रदान करणाऱ्या सैनिकांचे - ज्यांचे 'अस्तित्वात' असणे अनिवार्य आहे (अटळ असेल तेव्हाच) युद्ध करणे आणि एरवी सराव करणे, आपली सामुग्री अद्ययावत ठेवणे हे कर्तव्य कर्म आणि युद्ध हा कर्मयोग ठरतो.
६. युद्ध जिंकून प्रश्न सुटला का? - युद्ध टाळून काय भीषण दृश्य झाले असते हे मी अन्यत्र लिहिले आहे. अर्जुनाला आत्मबोध झाला का - भेटला की विचारून सांगेन.
संहाराचा असा कधीच उपयोग होत नाही, मात्र आत्मसंरक्षण न करणाऱ्या व्यक्ती, समाज वा राष्ट्राचा पुरता सत्यानाश होतो हे मी खात्रीने सांगू शकतो.
७. अर्जुनाला गीतेतून काय मिळाले या साठी गीता १८. ७३ वाचा.
मला आपणाबद्दल आकस नाही हे पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. मी केलेले उपहासात्मक लिखाण वैचारिक विसंगती, एकांगी विचार किंवा आचरट विचार यांची खिल्ली उडवण्यापर्यंत मर्यादित ठेवले आहेत. व्यक्तिगत उणेदुणे या पातळीला जाण्याची मला हौस नाही. आपली भूमिका मांडण्याचा मी यथाशक्ति, यथामति प्रयत्न करतो. उपदेश वगैरे देण्यात मला स्वारस्य नाही.
(संपादित : प्रशासक)