हा प्रतिसाद मला उद्देशून नाही, तरीही या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझ्या मनात आलेले काही विचार आपल्या परवानगीने मांडू इच्छितो. (परवानगी आगाऊ - किंवा आगाऊपणे -
गृहीत धरलेली आहे. क्षमस्व.)
१. जे (बहुसंख्य) अज्ञानी लोक "मी देह आहे" असे समजतात त्यांच्या न्याय, नीति, यांच्याबद्दलच्या कल्पनांमध्ये युद्ध हा शेवटचा पर्याय म्हणून का होईना समजण्यासारखा आहे.
माझ्यातील 'मी' म्हणजे 'देह' असण्यानसण्याबद्दल मला निश्चित खात्री नाही, परंतु अधोरेखिताबाबत सहमत आहे. मात्र ठळक केलेला भाग महत्त्वाचा.
२. भोंगळ मानवतावादी लोक अत्याचारी आणि न्यायी यांच्यामध्ये फरक न करता सरसकट युद्ध वाईट समजतात आणि त्याला विरोध करतात.
भोंगळ मानवतावादी लोकांबाबत (हे जे कोणी असतील ते) कल्पना नाही. माझ्यापुरते बोलू शकतो. तसे बोलायचे झाल्यास मी युद्ध सरसकट वाईट समजत नाही. मात्र युद्धाच्या योग्यायोग्यतेमध्ये, 'अत्याचारी' किंवा 'न्यायी'पेक्षा, 'आपल्या' बाजूच्या हितसंबंधांचे रक्षण किंवा पाठपुरावा त्यातून कमीत कमी हिंसेसह जास्तीत जास्त प्रभावीपणे होतो की नाही, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरावा, असे वाटते.
अन्यथा, 'आपली' बाजू ही प्रत्येकच बाजूला 'न्याय्य' वाटते, आणि 'अत्याचार' या मुख्य उद्देशाने कोणीच युद्ध करत नाही. (युद्धात एखाद्या किंवा दोन्ही किंवा अनेक किंवा सर्व बाजूंकडून अत्याचार होऊ शकतात - नेहमी होतातच असे नाही, परंतु होत नाहीतच असेही नाही, आणि व्हावेत असे तर मुळीच नाही - परंतु तसे ते झाले तरी तो अशा अत्याचार करणाऱ्या बाजूचा युद्ध करण्यामागील उद्देश नसतो. थोडक्यात, 'चला, बऱ्याच दिवसांत कोणावर अत्याचार केले नाहीत, आज थोडे युद्ध करू या' म्हणून कोणतीही बाजू, कितीही अत्याचारप्रवृत्त असली किंवा नसली तरी, युद्ध करत नाही. युद्धाचे कारण दुसरेच काहीतरी असते. मग ते कारण प्रदेश मिळवणे हे असो, संपत्ती मिळवणे हे असो किंवा स्वसंरक्षणार्थ, दुसऱ्या कोणत्याही बाजूला आक्रमण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी, आपल्या सैन्यशक्तीचा वचक निर्माण करणे किंवा प्रभावक्षेत्र वाढवणे हे असो. कोणत्याही बाजूकडून युद्धात अत्याचार झाल्यास, असा अत्याचार हा निव्वळ दुय्यम महत्त्वाचा, आणि 'टॅक्टिकल' भाग किंवा 'बायप्रॉडक्ट' यांपैकी एक, असू शकतो; तो मुख्य उद्देश नसतो. आणि अत्याचार हा न्याय्य नसला, तरी एखाद्या बाजूकडून अत्याचार होण्या-न-होण्याचा त्या बाजूचा युद्धामागील उद्देश न्याय्य असण्यानसण्याशी काही संबंध असतोच, असेही नाही.)
३. आपल्यासारखे आत्मसाक्षात्कारी लोक कुठल्याही तार्किक युक्तिवादाशिवाय "युद्ध वाईट" अशी भूमिका घेऊन तेच तेच परत परत सांगत असतात.