दोन्ही आवडले.
म्हातारबाई ठरविल्याप्रमाणे आमच्या पुढेच चालल्या होत्या. आकाशातल्या पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने आसमंत व सारी डोंगरराजी उजळून निघाली होती. त्या प्रकाशात ते डोंगर ध्यानस्थ योग्याप्रमाणे अजूनच गूढ भासत होते. दुरून कोठूनतरी रेडियोवरच्या गाण्यांचा अस्पष्टसा आवाज येत होता. मधूनच कोणाचे तरी हसणे. नाहीतर रात्रीच्या शांततेची दुलई गडावर पण पसरू लागली होती. अधून मधून कोणी हौशी लोक आम्हाला ओलांडून झरझर पुढे जात होते. आमच्या गोगलगायीच्या गतीने, धापा टाकत चालणाऱ्या चिमुकल्या समूहाकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. चांदण्याचा प्रकाश असला तरी मला आजूबाजूला पडलेल्या अंधाराची उगाच भीती वाटत होती. मधूनच झुडुपांमधून खुसफूस ऐकू येई. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर अचानक एखादा काजवा दर्शन देई. झाडांच्या हालचालीबरोबर त्यांच्या सावल्याही हालत. त्या पानांच्या सळसळीला ऐकले की माझी कल्पनाशक्ती काळोखात काही वेगळे तर दिसत नाही ना याचा विचार करत असे. त्यामुळेच की काय, हातातला टॉर्च उगाच काळोखात फिरवत मी सावल्यांचा अंदाज घेत पुढे चालले होते.
हे खासच.
विनायक