जोडाक्षरामागच्या शब्दावर अतिरिक्त आघात देणे किंवा त्याचे द्वित्व करणे ही मराठीची खोड ....
जोडाक्षराच्या मागच्या अक्षरावर(शब्दावर नाही! ) आघात देणे किंवा त्याचे द्वित्त करणे, हे मला वाटते, संस्कृतचे वैशिष्ट्य आहे, मराठीचे नाही. शाहिरी काव्व्याने(संस्कृत), तर गनिमी काव्याने(मराठी); सुकन्‍न्या(संस्कृत) नावाच्या कोळिणीने, तर सुकन्या(मराठी) नावाच्या कोळ्याने, वाह्‌ह्यात(संस्कृत), तर वह्यांत(मराठी). तसेच सूर्याची पिल्ले, तर सुऱ्याची धार, अशी अनेक उदाहरणे देता येतील.  कृष्ण+ऋद्धिः=कृष्णर्द्धिः=कृष्णर्धि:=कृष्णर्‌द्‌द्‌धिः; उद्‌+स्थानम्=उद्+थ्थानम्=उद्थानम्=उत्थानम्= उत्थ्थानम्. अशी अनेक उदाहरणे देता येतील. कर्ता आणि कर्तव्य सारखे शब्द कर्त्‍ता आणि कर्त्‍तव्य असेही लिहायला संस्कृतमध्ये मुभा आहे. हिंदीमध्ये ते बहुधा असेच द्वित्त करून लिहिलेले आढळतात.
मराठीत जे अक्षरांचे द्वित्त होते ते लहान मुलांशी बोलताना, प्रमाणाधिक्य दाखवताना किंवा कुचेष्टेने. खर्राखुर्रा मोठ्ठा राक्षस, सुळ्ळकन, आत्ताच्या आत्ता, लालभडक्क साडी, अव्वाच्या सव्वा, वगैरे. अनेकज़ण काही गरज़ नसताना अक्षरांचे द्वित्त करून शब्दांचे चुकीचे उच्‍चरण करतात, ती गोष्ट वेगळी. कोल्हा(पूर)ऐवजी कोल्ल्हा(पूर), पुन्‍न्हा(इति निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी), पन्‍न्हे इत्यादी. जिल्हा आणि वल्हे यांच्या उच्‍चारांतले द्वित्त कितपत प्रमाण आहे कोण जाणे!

मराठी लोकांच्या तोंडची संस्कृत भाषा कर्णकटू आणि कर्णकठोर वाटते.   
हे थोडेसे विवाद्य आहे.

तसेच विसर्गाचाही उच्चार नीटसा होत नाही.
या विधानाला स्पष्टीकरण दिले असते तर बरे वाटले असते. शब्दाच्या अधेमध्ये येणाऱ्या क-खच्या आधीचा जिव्हामूलीय नावाचा विसर्ग(दुःख), प-फच्या आधी येणारा उपध्मानीयनामक विसर्ग(कःपदार्थ) आणि स-शच्या आधी येणारे विसर्ग(दुःसह, दुःशासन) यांचे  उच्‍चार हिसक्यासारखे होतात. बाकीच्या शब्दान्‍ती येणाऱ्या विसर्गाचा मराठी माणसे मागील स्वरानुरूप हा, हि, ही हु वगैरे उच्‍चार करतात.   ते बहुधा बरोबर असावे. हाहाकार, अंधकार, घनश्याम, धिक्कार  वगैरे शब्दांत विसर्ग नाही हे काहीजणांना माहीत नसावे असे वाटते. त्यामुळे यातले पहिले तीन शब्द उच्‍चारताना अनेकदा विसर्गसदृश उच्‍चार ऐकू येतात.

या विषयावर अधिक चर्चा होणे अभिप्रेत आहे.