लेखातल्या पहिल्या दोन ओळींना आक्षेप आहे. आजकाल हे वाक्य पालुपदासारखे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संदर्भाला चिकटवलेले दिसते.  भारताची संस्कृती लोप पावली किंवा तिची अथवा देशाची अधोगती  झाली ह्या वाक्याचा रोख बहुधा गेल्या हजार वर्षांकडे आणि परकीय, विशेषतः मुसलमानी आक्रमकांकडे असतो.या काळात ज्या युरोपीय राष्ट्रांनी आपापली प्रगती साधत भार ताच्या पुढे आगेकूच केली त्या राष्ट्रांमधे या काळात स्थैर्य होते काय? उलट एक मतप्रवाह असा आहे की गेल्या दोन सहस्रकांच्या संधिकाळात  झालेल्या धर्मयुद्धांमुळे व नंतरही आपापसातल्या अनेक लहानमोठ्या युद्धांमुळे संपूर्ण युरोपात प्रवास, चलनवलन वाढले, वस्तूंचे आणि विचारांचे आदानप्रदान वाढले, ज्ञानाची झिरपण आणि पसरण वाढली. युद्धकाळात अडचणींवर, तात्कालिक गैरसोयींवर मात करण्याची निकड भासू लागते. त्यातूनच विज्ञान वाढीला लागून नवनवे शोध/सुविधा जन्म घेतात.अगदी अलीकडच्या दोन्ही जागतिक महायुद्धांच्या बाबतीतही हे खरे आहे. शांततेमुळे सुबत्ता, समृद्धी येते हे थोडेफार खरे आहे, पण त्यामुळे आत्मसंतुष्टता(कॉम्प्लेसन्सी) येते हे जास्त खरे आहे.(कृपया हे कोणी युद्धांचे समर्थन समजू नये.)

खरी गोष्ट अशी आहे की संस्कृतीच्या परमोच्च बिंदूवर पोचलेल्या समाजाचे तिथून अधःपतन हेच अटळ प्राक्तन असते. आधी अध:पतन आणि नंतर आक्रमण असा हा क्रम असतो. तसे नसते तर आक्रमणांना तोंड   देण्यात या संस्कृती यशस्वी ठरल्या असत्या. पुराणकाळातले द्वारकेचे यादवराज्य, इतिहासकाळातले रोमचे साम्राज्य, ऑटोमान् साम्राज्य, आपले मगध साम्राज्य ह्या सर्वांना हाच नियम लागू होतो.