"अप्पा जळगांवकरांचा पेटीचा बाजच वेगळा आहे. ती कधी कधी गायकापेक्षाही भाव खाऊन जाऊ शकते, नव्हे जातेच. ह्याबद्दल त्यांना गायकाचीही दाद मिळते हा भाग वेगळा. पण वालावलकरांची पेटी 'पतिं नातिक्रमेत' असं व्रत पाळणारी वाटते."

- हे बारकावे लक्षात येणे आणि ते शब्दबद्ध करता येणे दोन्हीना दाद देतो.

थोडी भर घालतो - साथीदाराने किती/ कसे वाजवावे याबद्दल प्रमुख कलाकाराच्या व्याख्या/ अपेक्षा वेगवेगळ्या असतात. उदा. पंडित कुमार गंधर्व ठराविक वजनानेच ठेका धरावा, तबलजीने उगाच 'बागडू' नये याबद्दल अत्यंत काटेकोर असायचे. उलट पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान आपले वादन थोडावेळ थांबवून टाळीवर ठेका धरून 'सोलो' तबलावादनाला प्रोत्साहन द्यायचे. साथीदाराने आपल्या वादनामुळे प्रमुख कलाकाराचा चेहरा खुलतो आहे की त्याच्या कपाळावर आठी पडते आहे याचे भान ठेवणे महत्त्वाचे.

माझ्या गुरूजींची मातृभाषा कन्नड. साथ करताना एखाद्या शिष्याने 'जोश मध्ये येऊन होश घालवला' की ते त्यांन्च्या कानडी वळणाच्या मराठीत मिष्कीलपणे सांगायचे 'अहो, त्यांचे साथीला बसलात तर साथी करा की, साडेसाती का करता? " यात सगळे आले.    

एकूणच अप्रतिम लेख. पु. ले. शु.