नमस्कार,

'कर्मण्ये... ' वरील विपर्यस्त टिप्पणी वाचून काही प्रश्न पडले. कामातील चालढकल, आळशीपणा, बेइमानी तसेच रूग्ण स्पर्धा,   गलिच्छ राजकारण आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना हे आज भारतापुढील प्रश्न आहेतच. कामाच्या वेळेत तासनतास 'चहाला' जाणारे रावसाहेब, भाउसाहेब पुढच्या वेतन आयोगासाठी मात्र हिरीरीने रस्त्यावर उतरतात. हा निष्काम कर्मयोग म्हणावा का? या सार्याचे खापर गीतेतील एका श्लोकावर फोडणे आपणास पटते का?  असल्यास कसे हे स्पष्ट कराल का? नसल्यास आपला विरोध स्पष्टपणे दर्शवाल का?

मी हे जे लिहीले आहे त्यात कट्टरपणा, मतांध वृत्तीचा भाग आपल्याला दिसतो का?

समग्रपणे यथाशक्ति, यथामति कर्म करणे हे आपल्या हातात आहे. मात्र फळावर आपण अधिकार सांगू शकत नाही. (उदा. ग्राहकाना सेवा मिळावी, आपल्याला रास्त मार्गाने नफा मिळावा यास्तव टाटा उद्योगसमूह 'ताज' चालवत आहे. त्यावर अतिरेकी हल्ला होऊन प्रचंड नुकसान होऊ नये हे मात्र त्यांच्या हातात नव्हते. व्यक्तिगत जीवनातही असे प्रसंग येतात. वर्षभर अभ्यास करून ऐन परीक्षा आली की मलेरिया होऊ शकतो. ) त्या मुळे असे विपरीत घडल्यास कोलमडून जाउ नये इतपत अनासक्त, स्थितप्रज्ञ अवस्था असावी. श्रेयस आणि प्रेयस यातला संघर्ष सनातन आहे. कर्तव्यकर्मापुढे 'प्रेयस' ला महत्त्व न देता ते अप्रिय वाटले, त्रासाचे वाटले तरी प्राणपणाने ते निभवावे असा गीतेचा संदेश आहे. थोडक्यात कर्त्याचे लक्ष कर्माकडे असावे, फळाकडे नाही.  कृष्णार्जुन नरनारायण जोडीने तसे आचरण करूनच हा आदर्श स्थिर केलेला आहे.

गीतेवरील अधिकारी व्यक्तींचे भाष्य वाचता, मग ते टिळक असोत, अरविंद असोत, आर्वीकर असोत, पारनेरकर असोत - कसलीच इच्छा न धरता ठोंब्यासारखे बसून राहा असा या श्लोकाचा अर्थ कुणीच सांगत नाही. गीतेचा एकही अभ्यासक उदासीन, निष्क्रीय, आत्ममग्न, अल्पसंतुष्ट आचरण करताना दिसत नाही. व्यक्तिगत अंतर्मुखी, बाह्यमुखी पिंडानुसार जीवितकार्य करण्याच्या पध्धतीमध्ये थोडाफार फरक असतो इतकेच. 

 सांख्य, आश्रमसन्यास हे मार्ग सामान्यजनासाठी नाहीत, अर्जुनाचाही तो मार्ग नव्हता म्हणूनच गीतेचे अठरा अध्याय झाले, अनेकविध योगांचा उहापोह झाला.  नाहीतर 'अगा जे का घडलेच नाही' या दुसर्या अध्यायातील अजातवादावरच खेळ संपला असता.  जिथे भगवंतच 'संभवामी युगे युगे' असा निर्वाळा देतात, तेव्हा निरीच्छ असणे हा भागच संपला. 'सत्कर्मी रती वाढो' असे घडत असताना हा श्लोक मुळीच मध्ये येत नाही असा माझा स्वानुभवही आहे. असो.

आपले मत अवश्य कळवा.

- हरिभक्त