काहींचं पत्र लेखन  काही औरच असते. माझी मैत्रीण मला पत्र लिहायची. साधारण १९७८-७९ च्या दरम्यानचे दिवस असावेत.  तिचे पत्र वाचताना गंमत वाटायची. डाव्या कोपऱ्यात वरून पत्राची सुरुवात ही अशी.. 'कसा आहेस?'  'तुला पत्र लिहायला वेळ नाही वाटतं' 'तू काय बाबा..'  'मी काय सांगते ऐक ना...रे'  (वाच ना..) जसं काही मध्ये बोलून मी हिचा मुद्दा तोडणारच आहे.  'मी ना गावी जात्येय.' अगदी डायरेक्ट मुद्द्याला हात.  लिखाणात मध्येच असे काही की..  'बोल ना रेऽऽ', 'शहाणाच आहेस', 'तू जास्त शहाणपणा करू नको हं', 'हो की नाही?', 'बघ हं'  पोस्टकार्डात तसूभर जागा शिल्लक ठेवेल तर शपथ. वाचन क्रम दाखवणारे अगणित बाण.  अगदी तिकिटाच्या वर, खाली, बाजूला सर्वत्र लिखाण. मध्येच कुठेतरी 'अक्षर खूप घाणेरडे आले ना..वाचता येतंय ना?.. जाऊ दे तू अक्षराकडे लक्ष देऊ नकोस'  थोडं पुढे हे ही लिहिलेले असते की 'अय्याऽऽ  मी पण काय वेडी वाचता नाही आले तर तुला कळणार कसे?... शीऽऽ बाई'  असे वाटायचे की संवाद समोरासमोर होत आहेत. ही बया फोन वर बोलतेय की लिहितेय. कहर म्हणजे हा पत्र प्रपंच मुंबई अंतर्गत असायचा.