संजयजी,
हा इंग्रजी उतारा प्रदीर्घ आहे. जालावर देताना प्रताधिकाराचा प्रश्न उभा राहू शकेल. त्यामुळे आपण हे पुस्तक मिळवून वाचावा, अशी आपल्याला आणि इतर मित्रांना विनंती.
या विषयावर खूप लिहिण्यासारखे आहे. पण सध्यातरी तुम्हा सर्वांची चर्चा वाचावीशी वाटतीय.
पैसा हे साध्य नसून साधन आहे. हे एखाद्या सुरीसारखे आहे. तुम्ही सुरीने फळ कापून भूक भागवू शकता, ते फळाचे तुकडे भुकेलेल्याला देऊन पुण्य घेऊ शकता किंवा बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळू शकता. पण तीच सुरी चुकीच्या दिशेने धरली तर तुमचा हात कापू शकतो किंवा समोरच्या दिशेने रोखली गेली तर तुम्ही गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल करू लागता. पैसा खेळवणे म्हणजे दात न काढलेल्या विषारी नागाला डोलवणे आहे. जरा तुमचे लक्ष विचलित झाले, की या नागाने तुम्हाला डंख मारलाच म्हणून समजा. मात्र या विषाने माणूस मरत नाही तर विषारी होऊन वावरू लागतो. आपल्या आसपास अशी अनेक विषारी माणसे वावरताना आपण पाहतो.
पण म्हणून पैसा वाईट का? अजिबात नाही. फक्त त्यालाच तुमच्या जीवनाचे सर्वस्व बनवू नका.
पैसा हे विनिमयाचे साधन असले तरी ते एका अमूर्त तत्त्वाचे मूर्त रुप आहे (आयान रँडचे वाक्य)
भारतीय संस्कृतीने कधीही पैशाला त्याज्ज्य मानले नाही किंवा त्याच्या महत्त्वाची उपेक्षाही केली नाही. भर्तृहरी आपल्या नीतिशतकात म्हणतो
तानींद्रियापी सकलानी तदेव कर्म/ सा बुद्धीरप्रतिहता वचत्रं तदेव/ अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव/ अन्यक्षणेन भवतीती विचित्रमेतत/
(अर्थ : तीच इंद्रिये, तेच कर्म, तीच कुशाग्र बुद्धी, तेच बोलणे पण एक अर्थाची (पैशाची) उब नसेल तर तोच माणूस क्षणात वेगळा भासू लागतो. )
माणसाने पैसा मिळवावा. स्वतः, कुटूंबाला, समाजातील गरजूंना सुखी ठेवावे. बुद्ध म्हणतो, 'जे तुम्ही देता ते तुमच्याकडे दहापटीने परत येते. म्हणून आपण इतरांना मदत करावी. '
आता जे अन्यायाने, वाईट मार्गाने संपत्ती मिळवतात त्यांच्याबद्दलही चाणक्याने सांगून ठेवले आहे
अन्यायोपर्जितं वित्तं दशवर्षाणी तिष्ठती/ प्राप्तेचैकादशेवर्षे समूलंच विनश्यती
(अर्थ : अन्यायाने मिळवलेला पैसा साधारणपणे दहा वर्षे टिकतो. अकराव्या वर्षी तो समूळ नाहीसा होतो.)