बुद्ध व चाणक्याच्या वचनांना शास्त्रीय आधार आहे, की नाही हा येथील मुद्दा नाही. ती वचने उद्धृत करण्यापूर्वी मी जे वाक्य लिहिले ते पुन्हा एकदा वाचावे, अशी विनंती.
भारतीय संस्कृतीने कधीही पैशाला त्याज्ज्य मानले नाही अथवा पैशाच्या महत्त्वाची उपेक्षा केलेली नाही, याची उदाहरणे म्हणून ती वचने दिलेली आहेत. तुम्हाला ती निराधार वाटत असतील तर मानण्याची सक्ती नाही. अशी वचने केवळ मार्गदर्शक म्हणून त्याकडे पाहायचे असते. त्यांना त्रिकालाबाधित सत्य कुणीच म्हणणार नाही.
बरं चिकित्साच करायची झाली तर या वचनांनी समाजाचे काय नुकसान झाले? समाजात दानी वृत्ती वाढणे किंवा अन्यायाच्या मार्गाने पैसा मिळवण्याबाबत घृणा निर्माण होणे चांगलेच नाही का?
अन्यायाने जमवलेला पैसा वर्षानुवर्षे पिढ्या न पिढ्या टिकलेली अनेक उदाहरणे आज दाखवता येतील, पण म्हणून अन्यायाने पैसा मिळवण्याचे समर्थन करता येईल का? धूम्रपान शरीराला वाईट असून त्यामुळे आयुष्य कमी होण्याचा धोका असतो, असे डॉक्टर सांगतात. त्यावर 'अहो! चर्चिल वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत अखंड चिरुट ओढत होताच की' असे सांगण्यासारखे हे आहे.