अध्यात्म या मूळ विषयाला धरून मी आता पर्यंत तीस-एक लेख लिहिले. अध्यात्म सर्वस्पर्शी असल्यानं, विषय नुसता अध्यात्मा पुरता मर्यादित न ठेवता; शरीर, पैसा, नाती, संगीत, प्रेम, सहजीवन, देव, दैव, श्रद्धा, न्यूनगंड, द्वैत, काल, ध्यान, सर्वज्ञता, मृत्यू अशा अनेक विषयावर मला ज्यावेळी जसं वाटलं तसं लिहीत गेलो.

आतापर्यंत माझ्या लेखनातून मी माझा अनुभव शेअर करत गेलो. आध्यात्मिक गैरसमज दूर व्हावे आणि सर्वांना जगायला मोकळं आकाश मिळावं हा त्यामागचा हेतू होता. आनंदी माणूस स्वतः: आनंदात जगतो आणि दुसऱ्याला आनंदात जगायला मदत करतो असं मला वाटतं आणि जितके जास्त लोक मजेत जगतील तेवढं समाज जीवन जास्त आनंदी होईल अशी माझी धारणा आहे.

खेळ, प्रणय, कोणतंही कार्यनैपुण्य, मानवी जीवनातला सर्वात महत्त्वाचा भाग : संगोपन, वेगवेगळे हिंदी संगीतकार (ओ. पी. नैय्यर, सलील चौधरी, एस. डी. बर्मन, नैशाद, रोशन, शंकर-जयकिशन, मदनमोहन) आणि त्यांच्या सांगीतिक सौंदर्याचा  त्यांच्या गाण्यातून घेतलेला वेध, जगण्याचा सगळ्यात लोभस पैलू : विनोद;  या शिवाय खुद्द अध्यात्माचा वेगवेगळ्या मार्गानी घेतलेला वेध: झेन, उपनिषदं, सध्या जगात प्रचलीत असलेल्या सर्व ध्यान पद्धती (मंत्रशास्त्र, कुंडलिनी, शक्तीपात आणि भक्तीमार्ग सोडून), पातंजलिंचा अध्यात्मिक दृष्टीकोन, श्री निसर्गदत्त महाराज या मराठी माणसाचं अध्यात्मिक काँट्रिब्यूशन  अशा इतर अनेक विषयांवर मला जसा मूड येईल तसं मी लिहीन.

या चर्चेचं प्रयोजन असं आहे की :

१) तुम्हाला मी एखादा विषयावर लिहावंस  वाटतं का?


२) माझ्या लेखनशैलीत मी काही बदल करावा असं तुम्हाला वाटतं का?

३) या शिवाय, ज्या विषयावर संपूर्ण लेख होऊ शकणार नाही पण सर्वांना उपयोगी होईल अशा अवांतर विषयांवर तुम्ही इथे प्रतिसाद देऊ शकता.

४) माझ्या इतर लेखांवर उशीर झाल्यामुळे तुम्हाला प्रतिसाद देता आला नसेल तर तो ही इथे देता येईल

संजय