परखड महाशय, प्रशासक महाराज आणि सहभागी मनोगती,
शुद्धलेखनाविषयी आपण मांडलेले मुद्दे आणि दिलेली माहिती दोन्ही अतिशय उपयुक्त आहे. ह्याविषयी आणखी थोडेसे -
- बरेचदा विशिष्ट माणसे विशिष्ट प्रकारच्या चुकाच अनेकदा, अनेक प्रकारच्या शब्दांबाबत करतात असे वाटते. (आमच्या हातूनही अश्याच विशिष्ट चुका होत असण्याची शक्यता आहे.) तेंव्हा त्यांना न कंटाळता त्या विशिष्ट प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा समजावून दिल्या तर शुद्धलेखनात लक्षणीय सुधारणा होते असे आमच्या एका परिचितांनी सप्रयोग सिद्ध केले आहे.
उदा० ॐकाररावांनी इतरत्र दिलेला नियम -
ठेव - ठेवून
जा - जाऊन
हा नियम लक्षात घेतला तर अनेक मंडळींचे शुद्धलेखन अचानक बऱ्याच प्रमाणात सुधारेल असे वाटते.
- हिंदी भाषेचे ज्ञान अथवा वापर हे मराठी शुद्धलेखनास मारक आहे. दीर्घाच्या ठिकाणी ऱ्हस्व वापरणे, ण च्या ऐवजी न वापरणे इत्यादी चुका त्यातून होतात. तेंव्हा हिंदीमराठीत जवळपास सारख्या दिसणाऱ्या शब्दांबाबत विशेष काळजी घ्यायला हवी असे वाटते.
मनोगती हो, प्रशासक महाराजांनी एवढ्या कष्टाने बनविलेल्या शुद्धलेखन चिकित्सकाचा वापर कितीही कंटाळा आला अथवा वेळ गेला तरी शक्यतो प्रत्येक लेखासाठी व प्रतिसादासाठी न चुकता करावा ही आग्रही विनंती!
आपला
(शुद्धलेखनवादी) प्रवासी