स्वभाषा वापरणाराचा अंतिम अधिकार अर्थात मान्य आहे. भाषा ही व्याकरणाआधी यावी याबद्दल दुमत नसावे. व्याकरणाचे कार्य हे 'भाषा कशी असावी' हे सांगणे (प्रिस्क्रिप्टिव) नसून, 'भाषा कशी आहे' याचे वर्णन करणे (डिस्क्रिप्टिव) होय, हे निर्विवाद आहे. आणि कोणत्याही भाषेत जे बदल होत असतात, ते अनेकदा संकेत हळूहळू बदलल्यामुळे होतात, संकेत तंतोतंत पाळले गेल्यामुळे नव्हे*, याबद्दलही शंका नाही.

*'ब्रह्म', 'ब्राह्मण', चिह्न', आह्लाद', 'बाह्य' या शब्दांच्या मराठीतील उच्चारांबद्दलच्या संकेतांत हळूहळू बदल होत जाऊन, 'ह' आणि त्याबरोबरचे जोडव्यंजन यांच्या स्थानांची आलटापालट होऊन हे उच्चार मराठीत हळूहळू 'ब्रम्ह', 'ब्राम्हण', चिन्ह', आल्हाद', 'बाय्ह' यांसारखे झाले, हे बहुधा याचे एक चांगले उदाहरण असावे.

मात्र, 'स्वभाषा वापरणाराचा अंतिम अधिकार' हा निकष एखाद्या शब्दप्रयोगाची योग्यायोग्यता ठरवण्यास पुरेसा आहे, असे वाटत नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे, व्याकरणाचे कार्य हे 'भाषा कशी असावी' हे सांगणे हे नव्हे. मात्र, व्याकरण हे भाषेच्या 'वेडेपणातील पद्धती'चा शोध घेण्याचे साधन आहे. व्याकरणाच्या नियमांप्रमाणे भाषा चालत नसली, तरी भाषा सध्या जशी चालते त्यामागे काही समाईक नियम दिसून येत असल्यास ते शोधून काढून त्यांची नोंद करण्याचे काम व्याकरण करते. हे नियम भाषेत होणाऱ्या बदलांबरहुकुम अर्थातच बदलू शकतात; मात्र असे बदल हे सहसा सूक्ष्मरीत्या आणि हळूहळू होतात. शिवाय असे नियम आणि त्यांतील बदल हे व्यापक समाजाच्या बोलण्याच्या पद्धतीची आणि तिच्यातील बदलांची कालानुरूप सरासरी दर्शवतात. थोडक्यात, कोण्या एका व्यक्तीने मनाला आले म्हणून एखादे वेगळेच रूप वापरले, तर ज्या भाषेचा वापर करताना ते वापरले ती त्या व्यक्तीची स्वभाषा आहे आणि ती भाषा आणि ते रूप ती व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने वापरत आहे, एवढ्या बळावर ते योग्य मानता येणार नाही. इतरही घटकांचा विचार करावा लागेल.

आजकाल मराठी ही आपली मातृभाषा म्हणवणारांपैकी अनेकजण 'पारंपरिक'ऐवजी 'पारंपारिक' असे रूप वापरताना दिसतात. आणि तसे ते वापरताना त्यांचा आत्मविश्वासही ओसंडून वाहताना दिसतो. परंतु केवळ 'पारंपारिक' असा शब्दप्रयोग करणारांची मातृभाषा मराठी आहे आणि अशी मंडळी असा शब्दप्रयोग अत्यंत आत्मविश्वासाने करतात, एवढ्याच भांडवलावर 'पारंपारिक' असे रूप मराठी भाषेतील वापरात बरोबर आहे (थोडक्यात, 'पारंपारिक' हा शब्द तत्सम नसून तद्भव आहे) असे निदान करता येऊ नये, असे वाटते. 'पारंपरिक'च्याच पठडीतील ('क्लास' अशा अर्थाने) 'सार्वजनिक', 'प्रातिनिधिक' या शब्दांची 'सार्वजानिक', 'प्रातिनैधिक' अशीही रूपे सामान्य वापरात नाहीत, याही बाबीचा विचार करावा लागेल. (शिवाय 'पारंपरिक' या शब्दाचे 'पारंपरिक' हेच रूप बहुतांशी सामान्य वापरात आहे, ही बाब आहेच.) या सर्व बाबींचा विचार करता 'पारंपारिक' हा शब्द 'रूढ' किंवा 'योग्य' नसून काही जणांची गैरसमजुतीने झालेली 'चूक' आहे, असे निदान आज तरी म्हणता येईल, असे वाटते. मग तशी 'चूक' करणारे ती कितीही आत्मविश्वासाने का करेनात.

त्याच नात्याने, भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांची मातृभाषा - किंवा किमानपक्षी स्वभाषा - हिंदी असावी, असे वाटते. (ती तशी नसावी असे म्हणू पाहणारे महाभाग कदाचित सापडतीलही, परंतु तो खोडसाळपणा म्हणून दुर्लक्षित करता यावा, असे वाटते. चूभूद्याघ्या.) आता श्री. राजीव गांधी यांची हिंदी भाषणे आपण जर कधी लक्षपूर्वक ऐकली असतील, तर अनेकदा 'ऐतिहासिक' या शब्दाऐवजी 'इतिहासिक' असा शब्दप्रयोग ते करत असत, अगदी आत्मविश्वासाने करत असत, असे लक्षात येईल. बहुधा आपला शब्दप्रयोग चुकीचा आहे, हे त्यांच्या गावीही नसावे. पण केवळ हिंदी ही त्यांची स्वभाषा होती, आणि असा शब्दप्रयोग ते हिंदी बोलताना अतिशय आत्मविश्वासाने करत, या बाबींच्या आधारे 'इतिहासिक' असा शब्दप्रयोग हिंदीत वापराकरिता 'योग्य' आहे, असे निदान करता येईल काय?

(उलटपक्षी, राजीव गांधींच्या हिंदीचीच गोष्ट पुढे न्यावयाची झाली, तर अनेकदा ते 'आम्ही अमूकतमूक गोष्ट केली आहे ' अशा स्वरूपाच्या वाक्यातील 'केली आहे' या शब्दप्रयोगाकरिता हिंदीत 'की है' याऐवजी 'करी है' असे म्हणत. परंतु या ठिकाणी मात्र ही त्यांची चूक मानता येणार नाही. कारण दिल्लीकडच्या बोलीभाषेत 'करना' चे 'करी' हे रूप सामान्य वापरात आहे. त्यामुळे हे रूप प्रमाण हिंदीच्या साच्यात कदाचित बसत नसले, तरी हिंदीच्या एका विशिष्ट बोलीभाषेचे वैशिष्ट्य म्हणून 'मातृभाषा किंवा स्वभाषा वापरणाराच्या अधिकारा'नुसार चालवून घेण्यास प्रत्यवाय नसावा. 'मैं ने यह बात की है' किंवा 'मैं ने यह काम किया है' यांऐवजी 'मैं ने यह बात करी है' किंवा 'मैं ने यह काम करा है', किंवा 'मुझे वहाँ जाना है' याऐवजी 'मैं ने वहाँ जाना है', अशी रूपे ही दिल्लीत सामान्य वापरात असलेल्या हिंदीच्या किमान एका तरी बोलीभाषेची वैशिष्ट्ये आहेत. कदाचित हे बहुधा फाळणीनंतर दिल्लीतील भाषेवर मोठ्या प्रमाणात झालेल्या पंजाबी भाषेच्या प्रभावाचे फळ असू शकेल असे वाटते, परंतु हिंदी ही स्वभाषा असलेला एक संपूर्ण समाजगट घरात आणि घराबाहेर अशी रूपे सातत्याने वापरतो, आणि अन्य रूपे सहसा वापरत नाही, या कारणास्तव 'स्वभाषा वापरणाराचा अधिकार' या ठिकाणी निर्विवादपणे लागू व्हावा. मात्र 'इतिहासिक'बद्दल असे म्हणता येणार नाही.)

आणखी एक उदाहरण या निमित्ताने देता येईल. समजा दोन मराठीभाषकांचा काही कारणावरून वाद झाला. ('दोन मराठीभाषक' म्हटल्यावर असे 'समजण्या'ची फारशी गरज नसावी हा भाग अलाहिदा.) वादातील एका पक्षाच्या मुद्द्यांचा (मुद्दे योग्य अथवा अयोग्य हा भाग पूर्णपणे वेगळा.) आणि त्यांचा पाठपुरावा न सोडण्याचा समजा विरोधी पक्षास अतिशय वैताग आला. या वैतागाची परिणती म्हणून वैताग आलेल्या पक्षास, समजा, 'ठीक आहे, तुमचेच बरोबर, पण आता पुरे' अशा स्वरूपाचे विधान करावेसे वाटले.

इथवर ठीक आहे. परंतु त्यापुढे जाऊन, उपरोक्त अर्थाने 'मी तुमच्या पायांवर डोके ठेवतो' ('विनम्रपणे उपकारांची याचना करतो' अशा अर्थी) असे विधान करण्याऐवजी सदर व्यक्तीने जर समजा 'मी तुमच्या डोक्यावर पाय ठेवतो' ('बटू वामनाप्रमाणे'?)  असे विधान (जाणूनबुजून की फ्रॉइडीय अगर बिगरफ्रॉइडीय जीभसटकंतीमुळे या मुद्द्यास येथे महत्त्व नाही.) केले, तर केवळ 'असे विधान करणाराची मातृभाषा अथवा स्वभाषा मराठी आहे' आणि 'असे विधान करणाराने ते अत्यंत आत्मविश्वासाने केलेले आहे', या दोन मुद्द्यांच्या आधारावर असा शब्दप्रयोग मराठीत ग्राह्य धरण्यात यावा काय?
 
माझ्या मते येऊ नये. कारण त्यामुळे मराठी भाषेत काही मूलभूत बदल झाले आहेत असा निष्कर्ष निघेल. आणि तसा तो खरोखर झाला आहे काय, हे असा प्रयोग ग्राह्य धरण्यापूर्वी तपासणे इष्ट ठरेल.

'डोक्यावर पाय' किंवा 'पायांवर डोके' या शब्दप्रयोगांतील 'वर' हा शब्द (शब्दयोगी अव्यय? चूभूद्याघ्या.) 'डोके' आणि 'पाय' यांच्यातील सापेक्ष स्थानसंबंध दर्शवतो. निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी हा ('वर' या शब्दाने दर्शवला जाणारा) स्थानसंबंध क्रमनिरपेक्ष नसावा. तसा तो हल्ली झाला असल्यास हा मराठीतील एक मूलभूत बदल मानावा लागेल. असा मूलभूत बदल मराठीत खरोखरच झाला आहे काय, ते तपासून पाहावे लागेल.

ते तपासण्याकरिता, व्यापक पातळीवर सामान्य मराठीभाषक जनांना 'डोक्यावर पाय' आणि 'पायांवर डोके' या दोन शब्दप्रयोगांतून एकच अर्थ प्रतीत होतो का, हे पाहावे लागेल. असा शब्दप्रयोग केवळ 'स्वभाषा वापरणाराच्या अधिकारा'ने ग्राह्य आहे असे मानण्यापूर्वी पन्नासएक मराठीभाषक जनांस उद्देशून 'मी तुझ्या डोक्यावर पाय ठेवतो' असे म्हणण्याचा (आणि परिणाम पाहण्याचा) प्रयोग करून पाहणे उद्बोधक ठरावे. त्यानंतर (तरीही उत्साह शिल्लक असल्यास) अन्य पन्नासएक मराठीभाषक जनांस उद्देशून 'मी तुझ्या पायांवर डोके ठेवतो' असे म्हणून पाहून परिणामांची तुलना करता यावी.

सरतेशेवटी, 'स्वभाषा बोलणाराचा अधिकार' हा मुद्दा वादातील प्रतिपक्षाची ती स्वभाषा नसताना कदाचित प्रभावी ठरू शकेलही, परंतु वादातील प्रतिपक्षाचीही तीच स्वभाषा असताना या मुद्द्यास कितपत महत्त्व राहते, याबद्दल किंचित साशंक आहे. त्यामुळे 'मराठी ही स्वभाषा म्हणून मी आत्मविश्वासाने वापरतो. यापेक्षा अधिक अधिकार कोणाचाही नसतो.'  या वाक्यातील 'यापेक्षा अधिक अधिकार कोणाचाही नसतो.'  हा भाग तितकासा पटण्यासारखा वाटत नाही. तीच स्वभाषा तितक्याच आत्मविश्वासाने वापरणाऱ्या इतरेजनांचाही किमान तेवढाच अधिकार असतो असे वाटते.

बाकी,

संकेत पाळायला पाहिजेत असे सांगणारे आपण कोण?

या मुद्द्याबद्दल बोलताना, भाषा हाच मुळात एक सर्वमान्य संकेत आहे, आणि (माहितीच्या, विचारांच्या, भावनांच्या, कदाचित शिव्यांच्या आणि इतर कशाकशाच्याही देवाणघेवाणीकरिता) एका व्यापक गटाने तो मान्य केलेला आहे हे लक्षात घेता, तो संकेत पाळायला पाहिजे असे जरी कोणालाही सांगता येत नसले, तरी असा संकेत गटातील एखाद्याने न पाळल्यास असा संकेतातील बदल सार्वत्रिकरीत्या स्वीकारावा की नाही, त्यास सर्वमान्यता द्यावी की नाही, हे ठरवण्याचा गटाचा अधिकार अबाधित राहतो,  हेही लक्षात घेणे आवश्यक आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(असा संकेत न पाळणारा तो संकेत धुडकावून लावून मुख फुटेस्तोवर आणि जगाच्या - किंवा निदान स्वतःच्या - अंतापर्यंत स्वतःचाच इतरांहून वेगळा असा संकेत एकट्यानेच पाळत राहूही शकेल. गटाकडून त्याला मान्यता मिळावीच असे गटावर बंधन राहणार नाही. मग अशा व्यक्तीने 'स्वभाषा वापरणाराच्या अधिकारा'चा कितीही दावा केला तरी.)