सत्य एकच आहे

‘सत्य’ एकच आहे... अभिव्यक्ती अनेक आहेत. सत्याचेच दुसरे नाव म्हणजे 'एक' किंवा त्या एकाचेच दुसरे नाव म्हणजे 'सत्य'. नांव काहिही द्या.... सत्य... स्वरुप... सर्वस्व... सदगुरू, जे कायम आहेच ते कधीही बदलू शकत नाही.
‘सत्य’ अभिन्न आहे पण त्याच्या अभिव्यक्ती फक्त भिन्न आहेत. ‘सत्य’ कायम आहे… आत्ता आहे… इथे आहे.

माझ्या दृष्टीने खरा सत्यशोधक किंवा साधक तो ज्याची 'नजर', ज्याचे 'लक्ष' सत्यावर आहे आणि ज्याची 'नजर' सत्यावर आहे त्याला कोठल्याही अभिव्यक्तीमध्ये "ते" सहज सापडू शकते. पण सर्व लक्ष फक्त अभिव्यक्तीवरच असेल तर, ते सुद्धा एका प्रकारचे बंधनच आहे. कोणीतरी कृष्णाची गीता वर्षोंवर्षे वाचतो आहे, कोणी तरी योग-वसिष्ठाची हजारो अनुष्ठाने करतो आहे तर कोणी ज्ञानेश्वरीची आजन्म पारयणे करतो आहे. इतके सारे करुनही जर आपण असलेल्या "ज्ञान-ईश्वराची" सत्य-नित्य... सहज ओळख जर झालेली नसेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणांचा काय उपयोग आहे हो....!!!!

ह्यालाच मी अभिव्यक्तींचे बंधन म्हणतो आहे. अनेक अभिव्यक्ती आहेत आणि नक्कीच त्या सुंदरही आहेत पण जर त्या,
साधकाला 'मोकळा' करण्यासाठी त्या त्यावेळापुरत्या असमर्थ असतील तर त्याच-त्याच अभिव्यक्तींमध्ये घुटमळण्यात, अडकण्यात फारसा काही अर्थ नाही. जर कोठलीही अभिव्यक्ती, मोकळे करण्याच्या ऐवजी जर उलट अजून बांधत असेल तर ते ही एक प्रकारचे बंधनच नव्हे का?

'सत्य' एखाद्या विशिष्ट अभिव्यक्ती मध्येच आहे हा देखील एक प्रकारचा भ्रमच आहे ना :-)! सत्य कायमच नित्य-नूतन रुपातून अभिव्यक्त होतच राहते आणि कायम राहणारच. पण साधकाची श्रद्धा मात्र भूतकाळावर इतकी अडकलेली आहे कि त्याला वर्तमान काळावर लक्षच जात नाही. जणू काही ‘सत्य’ फक्त भूतकाळातच जीवंत होते आणि वर्तमान काळात मात्र ‘सत्य’ मेले आहे :-). साधकाची वर्तमान काळावर जशी श्रद्धा दृढ होते तशी त्याची नजर... दृष्टी वर्तमान क्षणावर स्थिर होते आणि मग वर्तमानातील अभिव्यक्तींमध्ये त्याला सत्याची चाहूल लागू लागते, सत्याचा सुगंध सापडू लागतो... सत्याचे दर्शन होऊ लागते. होता होता होता... जे जवळाहूनही जवळ होते आणि आहेच त्या आपल्याच सत्य-स्वरुपावर त्याचे लक्ष जाते आणि ते आपलेच सत्य-नित्य स्वरुप आपोआप आणि कायमचे..... "उघड" होते.

सप्रेम नमस्कार

जय गुरू 

-नितीन राम                                          

www.abideinself.blogspot.com