सुवर्णमयी,
तुमचा सविस्तर व मुद्देसूद प्रतिसाद आवडला पण काही बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही.
भाषांतर आहे म्हणून ते कृत्रिम वाटते असे नसून अनेकदा शब्दशः भाषांतर असते म्हणून खुपते.बरोबर.
साहेबाची भाषा बोलतांना, लिहितांना सर्व नियम पाळून लेखन करतो, बोलतो...असहमत. इंग्रजी बोलताना व लिहिताना त्या सुंदर भाषेवरही इये मराठीचिये देशी तितकेच अत्याचार केले जातात. इंग्रजीवर बोलणाऱ्याचे व ऐकणाऱ्याचे प्रभुत्व सारखेच बेताचे असले तरी अज्ञानात सुख असल्यामुळे (व स्वतःविषयी फाजील आत्मविश्वास असल्यामुळे) हा संवाद "ठोकुनी देतो ऐसा जे" चालतो. बोलण्याचे सोडा, आजकाल इंग्रजी वर्तमानपत्रातील इंग्रजीची दुर्दशा पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. फरक इतकाच आहे की मराठीत आपण चुका करतो हे संबंधितांना मान्य असते पण त्याची फिकीर नसते, परंतु इंग्रजीत काही चुका होत असतील हेच त्यांना अमान्य असते. (अवांतर : भारत स्वतंत्र होऊन ६३ वर्षे झाली. आता तरी आपण सर्वांनी इंग्रजीस 'साहेबाची भाषा' म्हणणे थांबवायला हवे.)
ही सर्व मंडळी इंग्रजी / हिंदीतच विचार करतात आणि त्यानुसार फक्त लेखन मराठी करतात.असेच होत असावे. किंवा विचारही इंग्रजी/हिंदीत करत नसून इंग्रजी +/- हिंदी +/- मराठी असा महाराष्ट्राच्या त्रिभाषिक सूत्रानुसार करीत असतील.
पुस्तके, वर्तमानपत्रे ही माध्यमे त्यामानाने अजून दूरचित्रवाणीपेक्षा बरीच बरी आहेत.पुस्तकांविषयी तुमचे विधान बरोबर आहे, परंतु वर्तमानपत्रांची अवस्था दूरचित्रवाणीसारखीच आहे.