बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता. तो नेहरूंवर झेपावला. पण चाकू चालवणार इतक्यात नेहरूंनी त्याला आपल्या हाताने जोराने ढकलले. नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेतले काही पोलीस त्या तरूणाच्या दिशेने झेपावले. त्या तरूणाला त्यांनी ओढले. क्षणभर लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. त्या तरूणाचे नाव होते बाबू राव. तो साधा रिक्षा चालक होता.
ही सारी माहिती थरारक आहे. ह्या घटनेची सविस्तर बातमी आज इंटरनेटवर वाचता येते. ती sanganak.info वर उपलब्ध आहे.