कास्ट, गोत्र इ. विसरले तर चांगलेच. हे स्मरणातून काढून टाकले तर केवळ संधीसाधूपणाच उरतो असे नाही. भारतातल्या व्यवस्थेत घोळ आहेत असे आपल्याला वाटते का?त्याचा अर्थ इथल्या व्यवस्थेत दोष आहेत असा आपण घेता का? व्यवस्था म्हणजे समाजव्यवस्था की शासनव्यवस्था? आजची आपली शासनव्यवस्था फक्त साठ वर्षे जुनी आहे. ती जर इंग्रजांची देणगी मानली तर फारतर दोनशे वर्षे वय वाढवता येईल. त्याउलट आपली समाजव्यवस्था शेकडोहजारो वर्षांची जुनी आहे. आपली समाज व्यवस्था आताच फक्त शोषक झाली आहे, पूर्वी नव्हती असे तर आपल्याला म्हणायचे नाही? सध्याच्या शासनव्यवस्थेतला भ्रष्टाचार हा खूप मोठा दोष आहे हे मान्य. पण आज अनेकांच्या-बहुसंख्यांच्या आशाआकांक्षांचे प्रतिनिधित्व ती करते आहे.आणि साठ वर्षांपूर्वी, अडीजशे वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी पिळवणूक नव्हती का? सगळे लोक प्रामाणिक होते का? बायकांवरून, जमिनीच्या वादांवरून खून, विषप्रयोग होत नव्हते का? राजसत्ता उन्मत्त नव्हती का? कृष्णाने कंसासारख्या जुलमी राजाचा वध केला, चंद्रगुप्ताने धनानंदाचा वध केला. राजसत्तेमध्ये कारस्थाने, सत्तेसाठी माऱ्यामाऱ्या तेव्हाही होत्या. जनानखान्यातली, स्वयंपाकघरातली खलबते तेव्हाही होती. विधवांना सरसकट आड जवळ करावे लागत होते. सामाजिक आणि आर्थिक विषमता तेव्हाही होती. उलट प्रबळ होती. बहुसंख्य समाज लाज झाकण्यापुरत्या कपड्यालत्त्याला आणि रोजच्या दोन घासांना मोताद होता. छोट्या छोट्या आणि किरकोळ कारणांवरून सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत होते. आज शहरात तरी गड्यामोलकरणींना वापरलेले कपडे, शिळेपाके अन्न नको असते. व्यक्तीचा आत्मसन्मान वाढलेला दिसतो. शारीरिक श्रमाची किंमत वाढलेली आहे आणि प्रतिष्ठाही. दूरस्थ खेड्यांमध्ये आणि उत्तरी राज्यांमध्ये परिस्थिती कदाचित सुधारलेली नसेल, पण म्हणून ती सुधारतच नाही आहे असे नाही.

आशावादी राहायला खूपच जागा आहे आणि मुलांना आवर्जून सांगण्यासारखेही पुष्कळ आहे.....