केवळ मथितार्थ कळणे हाच लेखनाचा हेतू नसतो.  आपण कसेही वाढले लोक जेवणारच आणि त्यांनी काहीही खाल्ले तरी पोट भरणारच, मग नीटनीटकेपणा आणि योग्य आहार हवा कशाला? ह्याच विचारसरणीने लोक अशुद्ध लिहितात.

शुद्धलेखनाचा केवळ व्याकरणाशी संबंध आहे असे नाही.  शुद्धलेखनाचा संबंध शब्दोच्‍चारांशीही  आहे,  ज्याचे उच्‍चार चांगले त्याचे शुद्धलेखन बरे. आणि या उलट. मराठीत अकारान्‍त शब्दातल्या उपान्‍त्य अक्षराचा उच्‍चार आपण दीर्घ करतो हे लक्षात असले की  हातातून मणिपुर उमटणारच नाही.
शिर, शीर, चिर, चीर, मिरा, मीरा हे शब्द ऱ्हस्वदीर्घाचा विचार न करता लिहिले तर  चालतील?