भुतकाळात नेलंस एकदम. माझ्या घरी हे करायला कुणी नव्हतं पण गल्लीत शेजारी आम्ही दर उन्हाळ्यात मदतीला जायचो त्यामुळे आठवणी भरपूर आहेत. सालपापडी ताटलीतून सोडवण्यासाठी आम्ही सुई वापरायचो, ती सुई अलगद पापडीच्या कडांवरून फिरवल्यावर ती उचलण्यासाठी कड सापडायची. त्याहीआधी पापडीचं मिश्रण ताटलीत ओतल्यावर ते ताटलीभर छानपैकी पसरवायचं हीही खुप आवडीची गोष्ट असे. याशिवाय डाळींच्या मिश्रणाचे भाजीसाठीचे सांडगेही घालायचो.

कुरडया केल्यानंतर उरलेल्या चोथ्याच्या पण पापड्या केल्या जायच्या. त्याही तळल्यावर एकदम कुरकुरीत होत. एकदम पक्क्या आठवणी आहेत ह्या सगळ्या. ताजंतवानं व्हायला झालं आठवून. आता माझ्या घराजवळच्या खाऊच्या दुकानात गव्हाचा चीक (घरी नेऊन शिजवायचा फक्त आणि खायचा), उडदाच्या लाट्या हे जिन्नस विकतच मिळतात. माझ्या मुलाला हे खायला मिळेल, पण यातले काहीही आणि असेच कित्तीतरी प्रत्यक्ष अनुभवायला मात्र मिळणार नाही ही रुखरुख राहणारच.