स्वतःला व्यक्ती समजणं हे भीतीचं एकमेव कारण आहे!
जेव्हा आपण स्वतःला व्यक्ती समजतो तेव्हा आपला जगाकडे, परिस्थितीकडे आणि घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्तीगत होतो.
- जी बांग तुम्हाला भीतीदायी वाटते ती मशिदीतून त्या निराकाराला दिलेली साद असते.
- अंधार लपवून ठेवतो त्या गोष्टींचीच जास्ती भीती वाटते कारण भीती अंधारात नाही मनात आहे.
- आपल्या जवळची व्यक्ती नसेल तर हीच भीती मनात अक्राळ-विक्राळ रूप घेऊन बसते कारण भयमुक्तीसाठी तुम्ही दुसऱ्याचा आधार शोधतायं आणि तुम्ही स्वतःच स्वतःचा आधार आहात.
- आजारपणानंतर येणाऱ्या परिस्थितीची आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची भीती वाटते कारण तुम्ही स्वतःला शरीर समजतायं.
- भीती वाटते जवळच्या व्यक्तीला गमावण्याची, ही भीती व्यर्थ आहे कारण मृत्यू अनिवार्य आहे.
- त्याहून जास्ती भीती जाणवते ती त्या व्यक्तीला मनामधून गमावण्याची, त्या व्यक्तीच्या मनातून आपले स्थान कमी होण्याची... सर्व मानवी संबंध कल्पना आहेत आणि सर्व दुरावे गैरसमजातून निर्माण होतात, आपला हेतू शुद्ध असेल, आपण कुणाचाही फायदा घेणार नसू तर अशी भीती वाटत नाही.
- भीती वाटते ती नकार पदरात पडेल ह्याची. तिला मनातली गोष्ट सांगितल्यावर तिच्याकडून मिळालेला नकार. नोकरी मध्ये इंटरव्यू दिल्यानंतर मिळालेला नकार. नकारापेक्षा स्वाभिमान दुखावण्याची भीतीच जास्ती वाटते कारण तुम्ही स्वतःच अस्तित्व प्रसंगाशी जोडता आणि तुम्ही मुळात ज्यात प्रसंग घडतोयं ती स्थिती आहात.
- नकाराच्या जोडीलाच भीती वाटते ती अपयशाची. खास करून जेव्हा खूप मनापासून कष्ट करून एखादी गोष्ट केलेली असेल.. हा दृष्टीकोन आहे, प्रयत्न केला तरच चूक होण्याची शक्यता आहे आणि चूक झाली तरच नवीन शिकायला मिळण्याची शक्यता आहे.
- ह्याच्या परिणामी, आत्मविश्वासाला गेलेल्या तड्याची भीती वाटते, आत्मविश्वास म्हणजे 'मी आत्मा आहे' हा विश्वास तो एकदा गवसला की कोणत्याही प्रसंगात अढळ रहातो
- भीती वाटते अपयश पदरी पडल्यानं आलेल्या 'न्यूनगंडाची' आणि नंतर मग ह्या अपयशापेक्षा हि, 'यश न मिळण्याची' भीती जास्ती वाटते कारण आपण आपलं मूल्यमापन आपल्या अंगभूत स्थैर्याऐवजी घडलेल्या घटनांवर करतो.
- भीती वाटते मानता चालू असलेल्या असंख्य चिंतांची; 'मनातल्या इच्छा, जबाबदाऱ्या पूर्ण कधी होणार' ह्या व्याकुळतेची याचं कारण वर्तमानात न राहता उगीच भविष्यकालीन विचारात वाहवत जाणं आहे, स्वतःला जरासं सावरलं की आपण पुन्हा वर्तमानत येतो मग ती भीती नाहीशी होते.
- भीती वाटते एकटेपणाची; आजूबाजूला माणसांची गर्दी असूनपण त्यात आपलं माणूस नसल्याची. भीती वाटते आपल्या हाकेला 'ओ' न येण्याची; इतरांपासून वेगळे पडण्याची आणि त्यामुळे आलेल्या असुरक्षिततेची; जेव्हा स्वतःच स्वतःचा अधार आहोत हे समजतं तेव्हा ही भीती शून्य होते
- भीती वाटते परिस्थितीची, 'तशी' यातनादेयी परिस्थिती एखाद्यावर ओढवेल की काय ह्या विचाराची; हा आपणच केलेला निव्वळ कल्पनाविलास आहे हे लक्षात येता क्षणी ही भीती संपते
- आणि सर्वात जास्ती भीती वाटते ती 'माणसाची'. मतपरिवर्तन कधी होईल, मनातील विचार कधी कलाटणी घेतील सांगता येत नाही. एखाद्याच्या होकाराचा नकार कधी होईल सांगता येत नाही, जर आपण दुसऱ्याचा फायदा घेणार नसू तर या भीतेचं कारण उरत नाही.
- वेळोवेळी मिळणारा पश्चात्ताप, दुःख:, खोटेपणा, विश्वासघात.... नेमकी ह्याच गोष्टींची सर्वात जास्ती भीती वाटते कारण आपल्या वर्तनाविषयी आपण साशंक असतो, जर दुसऱ्याला दुखावण्याचा आपला हेतू नसेल तर कधीही पश्चातापाची वेळ येत नाही आणि विश्वासघात झाला तरी तो दुसऱ्याचा दृष्टीकोन आणि ते त्याचं ईमान असतं त्याचा आपल्या वागण्याशी काही एक संबंध नसतो.
....................पण 'माणूस' ह्या गोष्टीची भीती मात्र मनात कायमच घर करून असेल.
कारण आपण स्वतःला व्यक्ती समजतो आणि वास्तविकात आपण निराकार जाणिव आहोत!
संजय