सगळंच उपयुक्त आहे.  अशा स्वरूपाचा लेख लिहिण्याचे माझ्याही मनात होते पण इथेच एवढी चांगली चर्चा चालू आहे की प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही. 
ध्येयवेडाजी ह्यांनी भीतीच्या सगळ्या कारणांचे शब्दांकन छानच केले आहे आणि संजयजी आणि हरिभक्तजी ह्यांच्या प्रतिक्रियाही उपयुक्त आहेत. त्याप्रमाणे प्रयोग करत आहे. फक्त एक जाणवते की, हे असे प्रयोग एकदा केलं आणि झालं, असं म्हणून सफल होत नाहीत. परत परत ही जाणीव, अगदी 'जाणीवपूर्वक' मनात आणावी लागते. जाणीव कसलीही असो..... मी म्हणजे माझं शरीर नाही, ही असो किंवा वेळ म्हणजे एक कल्पना आहे, ही असो किंवा भविष्याची अनाठायी चिंता म्हणजे प्रत्यक्षात न घडलेल्या गोष्टींचा कल्पनाविलास, ही असो. अशी जाणीव लक्ष्यपूर्वक मनात आणली, तर त्या त्या क्षणाची भीती कमी व्हायला/दूर पळायला मदत होते हे नक्की, पण परत परत ह्या गोष्टीचा सराव करतच राहावा लागतो!

वय, परिस्थीती, अनुभव, विचार आणि मुख्य म्हणजे भीतीची कारणं बदलत राहतात..... पण "भय इथले संपत नाही!" काल ज्या गोष्टींची भीती वाटायची, त्यांची आज वाटत नाही. कालची भीती आज पूर्ण व्यर्थ वाटते...
तशीच आजची भीती उद्या पूर्ण व्यर्थ वाटेलही कदाचित, असाही विचार येतो... पण त्यामुळे आजची भीती संपूर्ण नाहीशी होत नाही... थोडी कमी होते....

शारिरीक वेदनेची भीती तर असतेच.... "मी म्हणजे माझं शरीर नाही. आत्त्ता माझं शरीर काहीशा त्रासात आहे, पण मी अबाधित आहे", असा विचार, जेव्हा शारिरीक वेदनेतून जात असते, तेव्हा प्रयत्नपूर्वक करणं, मला फार अवघड जातं. सगळा समजूतदारपणा, समंजसपणा, आहे ते, आहे तसं स्वीकारण्याचा शहाणपणा सगळं सगळं बाजूला पडतं. आहे त्या क्षणातली वेदना मनाला ग्रासून टाकते!

तरीही एक नक्की, पूर्वीपेक्षा जास्त बिनधास्त जगायला मी शिकले आहे, शिकत आहे. ह्या क्षणाचा, आजचा आनंद हा भविष्यात काही मिळेल किंवा नाही ह्या चिंतेपेक्षा महत्त्वाचा आहे, हे स्वतःला समजावायला शिकले आहे. त्यामुळे भविष्याची चिंता मिटली, असं झालेलं नाही पण स्वतःला त्रास करून घेणं जरा कमी होतंय, असं वाटंत...