> मी म्हणजे माझं शरीर नाही, ही असो किंवा वेळ म्हणजे एक कल्पना आहे, ही असो किंवा भविष्याची अनाठायी चिंता म्हणजे प्रत्यक्षात न घडलेल्या गोष्टींचा कल्पनाविलास, ही असो. अशी जाणीव लक्ष्यपूर्वक मनात आणली, तर त्या त्या क्षणाची भीती कमी व्हायला/दूर पळायला मदत होते हे नक्की, पण परत परत ह्या गोष्टीचा सराव करतच राहावा लागतो!
= तुमच्याकडे नेहमी एकच क्षण आहे आणि तो म्हणजे आताचा, हा क्षण, या क्षणी भीती दूर झाली आणि ती कशी दूर झाली हे लक्षात आलं की तुम्हाला फॉर्म्युला मिळाला, आता तोच पुन्हापुन्हा वापरला की झालं!
> काल ज्या गोष्टींची भीती वाटायची, त्यांची आज वाटत नाही. कालची भीती आज पूर्ण व्यर्थ वाटते...तशीच आजची भीती उद्या पूर्ण व्यर्थ वाटेलही कदाचित, असाही विचार येतो... पण त्यामुळे आजची भीती संपूर्ण नाहीशी होत नाही... थोडी कमी होते....
= 'आता' भीती नाही ना? इतकं बघणंच नेहमी श्रेयस आहे. ज्या क्षणी तुम्ही निर्भय असता तेव्हा एकच गोष्ट घडलेली असते, तुम्ही स्वतःशी कनेक्ट झालेले असता, ती निर्विचार स्थिती असते. पुन्हा नवा विचार आला की आपण त्या विचाराशी संलग्न होतो आणि स्वतःशी डिस्कनेक्ट होतो; सगळं रहस्य फक्त इतकंच आहे!
> शारिरीक वेदनेची भीती तर असतेच.... "मी म्हणजे माझं शरीर नाही. आत्त्ता माझं शरीर काहीशा त्रासात आहे, पण मी अबाधित आहे", असा विचार, जेव्हा शारिरीक वेदनेतून जात असते, तेव्हा प्रयत्नपूर्वक करणं, मला फार अवघड जातं. सगळा समजूतदारपणा, समंजसपणा, आहे ते, आहे तसं स्वीकारण्याचा शहाणपणा सगळं सगळं बाजूला पडतं. आहे त्या क्षणातली वेदना मनाला ग्रासून टाकते!
= 'वेदनामय शरीर' हा स्वतःला स्वतःपासून डिस्कनेक्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. मला वेळ झाला की मी या अफलातून विषयावर नक्की लिहिन.
> तरीही एक नक्की, पूर्वीपेक्षा जास्त बिनधास्त जगायला मी शिकले आहे, शिकत आहे. ह्या क्षणाचा, आजचा आनंद हा भविष्यात काही मिळेल किंवा नाही ह्या चिंतेपेक्षा महत्त्वाचा आहे, हे स्वतःला समजावायला शिकले आहे. त्यामुळे भविष्याची चिंता मिटली, असं झालेलं नाही पण स्वतःला त्रास करून घेणं जरा कमी होतंय, असं वाटंत..
= ही प्रयत्नांची अत्यंत योग्य दिशा आहे.
एक गोष्ट नक्की, माझं लेखन आणि इतरांचं लेखन सर्वस्वी वेगळं आहे त्यात वरकरणी साधर्म्य वाटलं तरी त्या दोन भिन्न दिशा आहेत. मी व्यक्तिमत्वाचा निरास सांगतोय आणि इतर लेखनात व्यक्तिमत्व समायोजन सांगीतलं जातं, त्यांची सरमिसळ झाली तर दिशाभूल होईल.
संजय