मला अगदी ह्याच मुद्द्याचा प्रतिसादात अंतर्भाव करायचा होता पण ते कदाचित अवांतर ठरले असते.
आदिवासींमध्येच कशाला, केरळातल्या नायर समाजात १९३० पर्यंत अधोवस्त्र हेच मुख्य वस्त्र होते. किंबहुना उष्ण हवामानाच्या दक्षिण भारतात पुरुषांचाही पेहेराव पंचासदृश आखूड अधोवस्त्र आणि खांद्यावर उपरणे असाच असे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी विधवा स्त्रिया एकेरी(उभे) वस्त्र नेसत आणि चोळी घालत नसत. रश्यन प्रवासी अफ्नासी निकितीन याने भारतातल्या लोकांचे वर्णन नग्न किंवा अर्धनग्न असे केल्याचे संदर्भ वाचले आहेत. आजही बाली बेटावरचे मूळ रहिवासी अर्धनग्नच असतात.
निरागस आणि मुक्त समाजांत वस्त्राला फार महत्त्व राहात नाही. दोष वस्त्राचा नाही, दोष बघणाऱ्याच्या दृष्टीचा आहे.
योरप अमेरिकेमध्ये वक्षस्थळे अर्धावृत राहातील असे अतिखोल गळ्याचे गाऊन वापरण्याची पद्धत बायकांमध्ये होती, आहे. १८-१९व्या शतकातील चित्रकला पाहिल्यास हे स्पष्ट होईल. तिथे पोट,पोटऱ्या आणि पाय उघडे दिसणे हे शिष्टसंमत नाही. पण खांदे उघडे राखण्यास त्यांची हरकत नसते. उलट आपल्याकडे बायकांचे अधोवस्त्र हे नेहमीच आखूड, काच्या मारलेले राहात आले आहे. जरीकाठी पायघोळ वस्त्रे नेसण्याची प्रथा महाराष्ट्रात सररास नव्हती. ती बालगंधर्वांनी रूढ केली. मी काही जुन्या पुस्तकांत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या काही छायाचित्रांत बायकांनी ओचे खोवून नेसलेली अर्ध्या पोटरीच्याही वर आलेली आखूड लुगडी पाहिलेली आहेत. मुंबईतल्या कोळी बायकांमध्ये लुगडे नेसण्याची जी पद्धत, म्हणजे गुढग्याच्यावर घट्ट नेसण आणि करकचून बांधलेला काच्यापदर, गेल्या वीसपंचवीस वर्षांपर्यंत प्रचलित होती, ती सर्व महाराष्ट्रातल्या बायकांचीच एकेकाळची नेसण्याची पद्धत होती.