तुमच्या वर्षा सहलीला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
खूप पूर्वी जेव्हा मी भारतात होतो तेव्हा आमचा मित्रांचा कंपू दर जुलैमध्ये माथेरानला जात असे. मुद्दाम अमावस्येच्या जवळचा शनिवार-रविवार ठरवायचो. अमावस्येला साधारण जोराचा पाऊस असतो म्हणून. शनिवारी सकाळी सर्वात पहिली लोकल पकडून आंबिवली-कल्याण-नेरळ असा प्रवास करायचो. बरोबर पाठीवर बांधलेली जुजबी कपड्यांची पिशवी. त्यात माथेरानच्या लाल मातीने रंगून फार वाईट वाटणार नाही असे कोरडे कपडे, टॉवेल, मुख्य म्हणजे रमी खेळण्यासाठी पत्ते, आणि वेदश्रीला न आवडणारी पेये जरूर असायला पाहिजेत. हे सर्व सामान एका मोठ्या प्लस्टिकच्या पिशवीत गुंडाळावे लागे.
पावसात भिजणे आणि पायवाटेने सात मैलाचा चढाव चढून जाणे हे ध्येय असल्याने छत्री, रेनकोट असल्या गोष्टींना वाव नसेच. घरातून स्टेशनपर्यंत चालत असतानाच पाऊस असेल तर आणखीच बरे. मग त्या पावसाच्या पाण्याने निथळत गाडीत चढून तिथल्या बाकांना अंघोळ घालायची किंवा सहप्रवासी फारच कुरकूर करत असतील तर दाराजवळच्या मोकळ्या जागेत उभे राहून प्रवास सुरू होत असे.
आमच्या मित्रापैकी एकाच्या ओळखीने माथेरानमध्ये राहायला बंगला असे. शिवाय तसेच कोणीतरी स्वयंपाक करून देणारा असे. एकदा तरी कोंबडीचा रस्सा असायचाच त्यामध्ये. शनिवारी दुपारी तिथे पोहोचल्यापासून रविवारी संध्याकाळपर्यंत खाणे, पिणे, पत्ते कुटणे आणि गाणी -शास्त्रीय संगीत-हिंदी-मराठी- सर्व प्रकारची, असा भरगच्च कार्यक्रम ठरलेला.
जाताना ३-४ तासाचा रस्ता येताना अगदी निम्म्यावेळात सहज पार व्हायचा. मग नेरळ स्टेशनवर दिवाडकरांचे बटाटेवडे झालेच पाहिजेत.
३०-३५ वर्षापूर्वीच्या त्या सहलींचे अनुभव आणि क्षण कोरून गेले आहेत आणि त्याच्या आठवणी नेहमी येत राहतील.
तुम्ही पण अशाच आठवणी जमा करा.
कलोअ,
सुभाष