रंगमंचावरची जिवंत धग - गिरगाव व्हाया दादर - जयंत पवार
मुंबईत भूमिपुत्रांचा प्रश्न जेव्हा जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण जागवली जाते. या लढ्याविषयीचं आपलं एक ढोबळ आकलन तयार झालं आहे. त्यात सेनापती बापट, अत्रे, डांगे, एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे आणि शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर ह्यांना आणि त्यांच्या प्रमुख साथीदारांना लढ्याचं नायकपद दिलं गेलं आहे. ते योग्यच आहे. पण कोणताही लढा नायकांच्या शौर्यावर आणि दूरदशीर्पणावर जरी लढला जात असला तरी त्याचं खरं बळ तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या तळाच्या सर्वसामान्य माणसांच्या झुंजारवृत्तीत दडलेलं असतं. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला त्याची खूण १०५ हुतात्म्यांच्या रूपाने ठाऊक आहे. पण या बलिदानामागची आग आपल्याला ठाऊक नाही. मराठी साहित्यात लालजी पेंडसेंनी लिहिलेला इतिहास, मीना देशपांडेंची 'हुतात्मा' ही कादंबरी, शाहिरांची कवनं आणि त्यावेळचे दस्तावेज यांतून त्याचं दर्शन घडलं आहे. मात्र रंगभूमीवर एक 'आंधळं दळतंय' या मुक्तनाट्याचा अपवाद वगळता त्याची ठळक नोंद नाही. हा लढा मराठी माणसाचा होता, तरीही तो लढणारा वर्ग कष्टकरी होता. त्यामुळे तो मराठी संस्कृतीत मिसळून गेलेल्या अन्य धमीर्य आणि प्रांतीय कष्टकऱ्यांचाही लढा झाला. ही जाणीव हरवल्यामुळेच अलीकडे परप्रांतीयांच्या आक्रमणाचा विषय घेऊन आलेलया मराठी नाटकांमध्ये त्याची आक्रस्ताळी आणि बटबटीत मांडणी झाली. मात्र 'गिरगाव व्हाया दादर' या नाटकाने या जाणीवेचं व्यापक भान तर दाखवलं आहेच पण या एकूण लढ्याची मांडणी गिरणी कामगारांची झुंज मध्यवर्ती ठेवून करत लढ्याचं अंतरंगही दाखवण्याचा बराचसा यशस्वी प्रयत्न केला आहे.
एक मोठा ऐतिहासिक पट आणि त्याच्या पोटात घडलेल्या असंख्य घडामोडी मांडण्याचं आव्हान अशा प्रकारचं नाटक त्याच्या र्कत्यांपुढे ठेवत असतं. ते पेलण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे, त्याचं इत्थंभूत वर्णन करायचं किंवा दुसरा, त्याचा एक बारीक काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्याप्रमाणे त्याचे तपशील टिपायचे, ज्यातून त्या ऐतिहासिक घटिताची स्पंदनं जाणवू शकतील. हा दुसरा मार्ग भल्या भल्यांनी यशस्वीपणे आणि परिणामकारकरित्या हाताळलाय. हृषिकेश कोळी आणि अमोल भोर या तरुण रंगकमीर्ंनीही तीच वाट निवडत आपल्या हुशारीची पहिली चुणूक दाखवली आहे. हे दोन्ही तरुण नाटक जिथे घडतं त्या भौगोलिक परिसराशीच संबंधित असल्यामुळे नाट्यविषयाच्या मांडणीतली अस्सलता ते टिकवू शकले आहेत. ही अस्सलता भाषेच्या वापरापासून परिसराच्या तपशीलापर्यंत आणि पात्रांच्या दिसण्यापासून वर्तनापर्यंत अनेक गोष्टींतून पाझरलेली आहे. अर्थात लेखक हृषिकेश कोळी आणि दिग्दर्शक अमोल भोर यांनी हा नाट्यऐवज आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पधेर्त आधी सादर करून आता तो मोठ्या नाटकाच्या रूपात सादर केला असल्याने आणि एकांकिकेच्या रचनेचा प्रभाव त्यांच्यावर अजूनही टिकून असल्यामुळे नाट्यप्रयोगात काही दोष मात्र निर्माण झाले आहेत आणि ते नाटकाला मोठं होऊ देण्याच्या आड आले आहेत. तरीही एक महत्त्वाचा नाट्यप्रयत्न म्हणून आपण 'गिरगाव व्हाया दादर'कडे पाहू.
परळच्या हरी निवास या चाळीत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं लोण पसरत चाळीतला प्रत्येक सामान्य माणूस आतून कसा पेटत जातो आणि बाहेर रण पेटलेलं असतानाही निधड्या छातीने मैदानात उतरून गोळ्या झोलतो, याचीही गोष्ट आहे. रघुनाथ हा तरुण कम्युनिस्ट कार्यकर्ता गोवा मुक्तीसंग्रामात त्याच्या गुरुजींचा बळी गेल्यावर चवताळतो. मुंबईतील पोर्तुगीजांच्या वकिलातीसमोर त्यांचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त करतो. हीच ठिणगी भाषावार प्रांतरचनेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार याची कल्पना येताच अंगार बनते. या चाळीच्या मालकांचा मुलगा अनंत साने हा गांधींच्या हत्येनंतर विलायतेहून मायदेशी परतलेला आहे. तो प्रजा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. तोही आंदोलनात उतरतो. पण त्याचा मार्ग अहिंसक आहे. डांगे, एसेम यांच्या मागून लढ्यात उतरलेले कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्यातली तेढ, मतभिन्नता यांचं रघू आणि अनंताद्वारे दर्शन घडतं. चाळकऱ्यांकडून आधी रघुला होणारा विरोध, सामान्यांची द्विधा मनस्थिती, माधवच्या रूपाने शाळकरी पोरांची पेटलेली मनं आणि सरकारची तळी उचलणाऱ्या पोलिसांचा यातला रोल हेही दिसत जातं. रघुवर प्रेम करणाऱ्या देवयानीचा एक धागा कथानकाला वेगळी डूब देतो तर रमा शिंदे हिच्या रूपाने आंदोलनातला कामगार स्त्रियांचा सहभाग ठळक केला जातो. सामान्य दिसणाऱ्या कामगार स्त्रियांनी रस्त्यावर उतरून मोर्च्यात अग्रभागी राहून बजावलेली कामगिरी हा या आंदोलनातला स्वतंत्र अध्याय आहे. त्याची धग रमामधून दिसते, तरीही शेवटाकडे ज्याप्रकारे ही व्यक्तिरेखा मोठी होत केंदवतीर व्हायला हवी तशी मात्र होत नाही. नाटकभर केंदस्थानी राहिलेल्या रघूची अखेरही चटकन होते.
सचिन गावकर यांनी उभी केलेली चाळ, तिच्या परिसराची तपशीलवार रचना आणि त्यात दिग्दर्शक भोर याने पात्रांच्या हालचालींतून जिवंत केलेलं वातावरण हा या नाटकाचा सर्वात मोठा विशेष आहे. भूषण देसाईच्या कल्पक प्रकाश योजनेने वातावरणातला सन्नाटा, भयसूचकता, कारुण्य आणि धुम्मस निर्माण करण्यात मोठा हातभार लावला आहे. अभिजीत पेंढारकरचं संगीत त्याला पूरक टरलंय. हृषिकेश कोळीची प्रवाही, अनेकदा सुभाषितवजा होऊनही सहज वाटणारी संवादरचना यांनी एक वेग निर्माण केला आहे. त्यामुळे अनेकदा एकसुरी हालचाली होऊनही त्यातला भावनावेग आपल्याला खेचत नेतो. एका चाळीतल्या माणसांची गोष्ट असंच नाटकाचं मर्यादित आणि शार्प फोकस्ड स्वरूप राहतं तर नाटकाचा एकूण परिणाम कितीतरी पटींनी वाढला असता. परंतु लढ्याचे बाहेरचे तपशील पात्रांच्या तोंडून वदवून आणि उत्तरार्धात तर या चाळकऱ्यांचं व्यापक मराठी जनसमूहात रूपांतर करून त्याची प्रतिकात्मकता वाढवण्याच्या प्रयत्नात लेखक-दिग्दर्शक तो ढोबळ करून टाकतात. आंदोलनाचा घटनाक्रम सांगणं हा नाटकाचा उद्देशच नाही, हे भान लेखकाकडून सुटतं आणि पुढे रघू, रमा मेल्यावर आंदोलनाची सूत्रं देवयानीकडे देण्याचा आणि काही टाळीबाज आकृतिबंध बांधण्याच्या मोहात दिग्दर्शक अडकतो. स्पर्धात्मक नाट्यरचनेमुळे हे दोष निर्माण होतात. कोळी आणि भोर यातून लवकर बाहेर पडले तर (आणि तरच) त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे.
रघूच्या भूमिकेत स्वप्निल हिंगडे याने उत्तम तडफ दाखवली आहे. आपल्या दमदार आवाजाचा त्याने केलेला वापर आणि उभे केलेले ताणाचे क्षण लक्षणीय आहेत. ऋतुजा बागवेच्या (देवयानी) अभिनयातली उत्स्फूर्तता काही जिवंत क्षण उभे करते. तिची समज उत्तम आहे. तरीही तिच्या अभिनयात स्पधेर्तून येणाऱ्या काही सांकेतिक आणि हुकमी लकबी दडलेल्या आहेत, त्यांच्या प्रभावातून तिला बाहेर यावं लागेल. प्रदीप डोईफोडे (पत्रकार कांबळी), अतुल सणस (गिरीष) आणि महेश वरवडेकर (अनंत) यांची कामगिरी उठावदार झाली. बाकी सर्व कलाकार त्या वातावरणात साजून दिसले.