आपले लेख नेहमी वाचतो, शब्दानं शब्द वाचून पण बऱ्याचदा उमजत नाही. शून्याची/शून्य स्थितीची जाणीव प्रयत्न करूनही काही होत नाही. पण प्रयत्न चालू आहेत.

माझ्या आयुष्याचा अर्थ काय? हा प्रश्न जेव्हा "मी" स्वतःला विचारतो, तेव्हा अमकं-तमकं करण्यासाठी माझा जन्म झाला आहे अशी मीच स्वतःची खूणगाठ बांधून घेतो. (किंवा कदाचित तशी माझीच स्वतःला खात्री पटते) पण हे अमकं-तमकं करणं हे शिवधनुष्य पेलवण्याइतपत कठिण वाटतं.

"असाध्यम् साधय" वा "impossible is nothing" असं म्हणणं सोपं आहे. पण त्यासाठी प्रयत्न, चिकाटी अन, "आत्मविश्वास" असणं गरजेचं आहे असं म्हणतात.  त्यापैकी प्रयत्न तर सगळेच करतात, चिकाटीही बरेचजण दाखवतात, पण आत्मविश्वास फार कमी जणांकडे असतो. अलीकडेच एक आत्मविश्वास प्रशिक्षण क्रम (कोर्स) केला. त्याचा किती फायदा झाला हे माहीत नाही.

मला नेहमीच एक प्रश्न पडायचा आणि अजूनही पडतो, ज्या यशस्वी लोकांची उदाहरणं दिली गेली वा नेहमी दिली जातात त्यांचा आत्मविश्वास कदाचित प्रबळ असू शकतो. पण त्याचा "अहंकार" लोप झालेला असतो का? त्यातल्या काही व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यातलं असाध्य साध्य केलेलं असतं (बहुदा). ह्या स्थितीला जाऊन पण नंतर आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो का (पुढील वाटचालीत)? त्यांना वैश्विक सत्य उलगडलेलं असतं का? पैसा आणि प्रसिद्धी ह्याच दोन परिमाणांनी यशापयशाचं मोजमाप करणं योग्य की अयोग्य? अयोग्य असेलही, पण वैश्विक सत्य उलगडून पण, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असेल, अगदी तसंच नाही, पण  समजा आर्थिक स्थिती बेताची/खालावलेली असेल, वा असाध्य साध्य करता येऊ शकलं नसेल, तर त्या वैश्विक सत्य समजण्याचा काय फायदा?