अरूणश्री, तुमच्या सारख्या मनाची सखोल जाण असणाऱ्या लेखकाच्या दीर्घ प्रतिसादाबदाल धन्यवाद!
>मला तर हल्ली असं वाटतय, की आपलं जीवन ठरवून ठेवलेलं आहे आणि काय ठरवलय ते प्रत्येकाला माहित नाही. आपलं जीवन खडतर आहे की सुखावह याने चैतन्याला काहीही फरक पडत नाही. प्रत्येक जीवन हा एक सृष्टीचा नियम असावा, ज्यावर आपला ताबा येऊ शकत नाही.
= शरीर जीवंत असताना आपण चैतन्य आणि व्यक्ती (आकार आणि निराकार) एकाच वेळेस आहोत. जीवनावर आपला ताबा नाही, पण निराकाराला जाणून आपण ज्याच्यावर प्रसंगाचा काहीही परिणाम होत नाही अशा निर्वैयक्तिक समस्थितीला येऊ शकतो ही आध्यात्माची महत्ता आहे
>अध्यात्म वगैरे इतर सर्व सिद्धांत हे मनाला शांत करण्याचे उपाय असावेत, पण आपल्या जीवनापेक्षा त्यांना महत्त्व जास्त नाही.
= अध्यात्म मनाला शांत करतंच पण जगायलाही मजा आणतं, अध्यात्म जीवनविरोधी नाही, ते जीवन स्वच्छंद करतं.
>तसेच जगाची निर्मिती सगळ्यांसाठी झालेली आहे. त्यामुळे जग एकच असून सर्वांना वेगवेगळं दिसत असावं.
= व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळं आयुष्य आलंय पण ज्या ‘निर्वैयक्तिक निराकार मी’ चा उद्घोष अध्यात्म करतं तो एकच आहे.
>मानसिक शांतता अशी "लेबल " लावलेली गोष्टच नसावी. किंवा जीवन हा फार मोठा भ्रम असावा. ज्याला जसा जन्मतः मिळाला तसाच तो राहतो. तोच त्याला ओळखीचा वाटतो. आपण व्यर्थ धडपड करू नये.
= ‘स्व’ किंवा हा ‘सार्वत्रिक मी’ सापडला की जीवन चित्रपटासारखा वाटतो कारण तुम्हाला ज्यावर सर्व खेळ चाललाय तो पडदा (निराकार) गवसलेला असतो. मला वाटतं ‘स्व’चा शोध ही माणसाची अत्यंत आंतरिक आस आहे कारण सर्व अस्वास्थ्याचं कारण ‘स्व’चं विस्मरण आहे.
>फक्त आपली इथलं राहणं सुखावह होतय किंवा नाही हे जरूर पाहावं व जमेल तसं ते सुखावह करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. फारसे अट्टाहास धरू नयेत. ज्यातून दुःख निर्माण होतय ते आपले भोग समजावेत व भोगण्यास तयार राहावं.
= नक्कीच पण एकदा निराकार गवसला की सगळे भोग संपले!
>हे माझं लिखाण जरा जास्तीच होतय असं वाटतय. पण मला हे नेहमी वाटतं कसही वागलं तरी मरण अटळ आहे, आणि ते आहे हे बरं आहे. थोडा विचार करून पाहिल्यास अमरत्व हा शाप ठरेल असं वाटतं.
= शरीराला येणारं मरण ही शारीरिक दृष्टीनं सर्वात सुखाची गोष्ट आहे कारण प्रत्येक देह कालबद्ध आहे आणि तो जन्म, यौवन आणि जरा या अवस्थातून मृत्यूप्रत जातो पण खुद्द आपण (हा आपल्या सर्वांचा ‘मी’ ज्या विषयी हा लेख लिहीलायं) अमृत आहोत. निराकार कसा मरेल?
>संजय साहेब या बाबतीत लिहितात म्हणून अशी मतं मांडता तरी येतात. त्यांचे लेख काही वेळा काही प्रश्नांची उत्तरंही देतात, असा माझा अनुभव आहे. लिखाण अप्रतिम असतं. या विषयावर रंजक लिहिणं कठीण आहे.
= मन:पूर्वक धन्यवाद!
>नाहीतर आम्ही कशाला कथा लिहित बसलो असतो?
= ललित लेखक जीवन रंगीतच करतो, नुसता निराकार किंवा अव्यक्त काय कामाचा? मजा तर यायला हवी ना? टाईमपास तर हवा ना? निराकार म्हणजे रिकामं सभागृह, नाटक रंगायला पात्र तर हवीत ना!
ललित लेखन मानसिक आणि भावनिक असतं, अध्यात्मिक लेखन मन आणि भावना पार करत तुम्हाला स्वत:प्रत आणण्याचा प्रयत्न करतं इतकंच.
संजय