>क्षीरसागरसाहेब, मी नेहमीच आपले विचार वाचते. कधीकधी अभिप्रायही दिले असतील. पण बरेचदा दिले नसतीलच. आज आवर्जून सांगावेसे वाटले की, " तुम्ही मांडलेल्या गोष्टी माहीत असतातच प्रत्येकाला पण त्यांची जाणीव दबलेली, मनाच्या आत कुठेतरी दडलेली राहते. तुमचा लेख वाचला की किमान तो पूर्ण दिवस अनुषंगिक विचार पिंगा घालत राहतात. निरनिराळ्या प्रकारे स्वतःशीच संवाद घडत राहतो. हे फार महत्त्वाचे वाटते मला आणि ते तुमच्या सातत्याने ( काही वेळा जड वाटणारे असले तरीही.. ) केलेल्या लिखाणाने घडते. "

= प्रथम, तुमच्यासारख्या लेखिकेनं दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! माझ्या लेखानं तुम्ही अंतर्मुख होता हे नक्की पण तो अनुभव, त्यातनं तुम्हाला झालेला उलगडा तुम्ही आचरणात आणलात तर तुमच्या जीवनात तरलता येईल.

संदीपच्या ओळी आहेत:

कधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

तुम्ही पाणी आहात, जग चांदणं आहे आणि हा पाण्याला चांदण्यांचा होणारा स्पर्श मी तुम्हाला देऊ करतोयं.

>आजचा विषय जास्त भावला. ' स्पर्श होऊनही अस्पर्शित राहणे ' या मागची कारणमिमांसा... तिचा उलगडा, उदा., अतिशय परिणामकारक रितीने मांडलेत. लेख संग्रही ठेवते आहे. धन्यवाद.

= जेव्हा तुम्हाला ती तरलता रोजच्या जगण्यात अनुभवाला येईल तेव्हा पुन्हा प्रतिसाद द्या.

मी क्षीरसागरसाहेब म्हणण्या इतका मोठा नाही, साधा संजय आहे आणि तुम्हाला जे माहितीये, जाणवतंय, तेच सोप्या शब्दात लिहीतोयं, माझा अनुभव तुमचा व्हावा इतकीच अपेक्षा आहे.

संजय