किशोरीजींच्या संपूर्ण जीवनावर अमोल पालेकर (आणि संध्या गोखले) नि काढलेली ही डॉक्युमेंट्री मी अत्यंत लक्षपूर्वक पाहिली त्यात किशोरीजींनी म्हटलंय की ‘माई (म्हणजे त्यांची आई) म्हणायची की शब्द स्वराची शक्ती क्षीण करतो’. किशोरीचं सगळं गाणं या धारणेवर आधारित आहे.
त्यामुळे ‘नाट्यसंगीताचा जास्त प्रभाव जर पडला तर शास्त्रीय संगीताची जी शान आहे, त्यात स्वरांच्या ज्या श्रुतिव्यवस्था आहेत त्याला जो दर्जा आहे तो खलास होईल असे माझे मत आहे’ असं विधान तिनं केलंय.
पुढे तिनं जे म्हटलंय ‘नाट्यपदं नसती तर हेच शास्त्रीय संगीत अजून वाढीला लागलं असतं’ ते तिच्या त्याच धारणेचं स्पष्टीकरण आहे.
पण वास्तविकात तसं नाहीये कारण नुसत्या आलाप आणि तानांतून अभिव्यक्ती अशक्य आहे, शास्त्रीय संगीताला कितीही लहान असली तरी बंदिश हवीच. नुसत्या स्वरात फक्त कोकिळाच गाऊ शकेल कारण शब्दाशिवाय अभिव्यक्ती असंभव आहे मग ते कोणतंही संगीत असो.
जर गायकी शब्दप्रधान झाली तर ती नाट्य, सुगम किंवा उपशास्त्रीय संगीत होईल आणि स्वरप्रधान असेल तर शास्त्रीय होईल इतकाच फरक आहे.
शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत दोन्हीवर सारखेच प्रेम करणाऱ्या रसिकाचा गोंधळ उडण्याचं काहीच कारण नाही. जर ऐकण्याची क्षमता तीव्र आणि निवांतपणा असेल तर शास्त्रीय संगीत आहे आणि इतर वेळी बाकीचं संगीत आहे.
संगीतासारख्या सुरेल विषयावर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी चर्चा करणं मग ती गायका-गायकात असो की भिन्न संगीत प्रकारात असो, असांगितिक वाटतं.
संजय