नव्या नव्या उपचार पद्धती खरे तर जुन्याच असतात. आपल्याला माहित नसतात एवढेच. रामदेव बाबांनी अनेक आयुर्वेदिक औषधांचे जोरदार मार्केटींग केले त्यामुळे आज आपल्याला अनेक औषधे माहित झालीत. प्रत्येक पॅथीवाले दुसऱ्या पॅथीला मूर्खात काढतात. निरनिराळ्या औषध कंपन्या आपली औषधे डॉक्टरांनी रुग्णांना घ्यायला लावावीत म्हणून त्यांना निरनिराळी आमिषे ( टीव्ही, फ्रिज, फॉरेन टूर, कमिशन, इ.) दाखवतात. आपल्याला काहीच समजत नसल्यामुळे आपल्याला डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचे सेवन करणेच आपल्या हाती आहे. रामदेव बाबांचे अतिरंजित दावे ऐकून अनेक लोक त्यांच्या दुकानासमोर रांगा लावतात पण तरीही डॉक्टरांकडील गर्दी तसूभरही कमी झालेली नाही.
प्रदूषणामुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा पण अगदी मोजून मापून जगणाऱ्या लोकांना सुद्धा निरनिराळ्या व्याधींनी ग्रासले आहे. आपल्याला जगण्याची एवढी ओढ आणि गरज आहे की निरनिराळे औषधोपचार करून आयुष्य वाढवणे आपल्याला आवश्यक वाटते. "ट्रायल अॅंड एरर" हा प्रयोग डॉक्टर्स आपल्या रुग्णांवर करतात. काही दिवसात गुण दिसला नाही की आपल्या आजूबाजूचे हितचिंतक आपापले अनुभव सांगून आपल्या कमकुवत मनामधे अजूनच गोंधळ निर्माण करतात.
शरीर आपणहून व्याधींना दूर करू शकत नसेल का? आपण आजार निर्माण करणारे अन्न प्राशन करतो आणि त्यानंतर आजार पळवण्यासाठी औषधोपचार करतो किंवा करावे लागतात. एखाद्या रोगावर खात्रीशीर औषधोपचार असू शकतो का? मानव प्राण्याचे शरीर इतके गुंतागुंतीचे आहे की प्रत्येक की अनेक व्याधींवरील उपचार नवीन व्याधींना जन्म देतात. एका शरीरात दोन अशा व्याधी असू शकतात की त्यांची औषधे एकमेकांना चालत नाहीत. एक ना अनेक. ऐकावे ते नवलच. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार आपण औषधोपचार केला तरीही रोगनिवारणाची खात्री देता येत नाही. मार्केटींगच्या आहारी न जाता, परिणामांची जबाबदारी स्विकारून आपल्या शरीरावर निरनिराळे प्रयोग करणेच फक्त आपल्या हाती आहे.
अतुल सोनक