भक्तीपूर्वक अर्पण केलेले एखादे पान, फूल, फळ अगदी तोय सुद्धा देवाला प्रिय असते असे भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेलेच आहे. इतकेच नव्हे तर 'सकलपूजार्थे अक्षतां समर्पयामि' असे म्हणून जवळ नसलेल्या पूजाद्रव्यांची उणीव भरून काढण्याची सोयही आपल्या पूजाविधीत आहे. इतके असूनही महागडे आणि दुर्मीळ असे पूजासाहित्य  देवाला वाहण्याची चढाओढ लागते यात भक्तीपेक्षा दिखाऊपणा आणि डामडौलच अधिक असतो हे उघड आहे. केवळ फुले पानेच नव्हेत तर मोठमोठ्या आराशींसाठी थर्मोकॉल, प्लॅस्टिक,सेलोफेन, जाड पुट्ठे वापरून बडेजाव मिरवण्याचीच प्रवृत्ती दिसते.

यामुळे होणारे नुकसान हे त्रिविध प्रकारचे आहे. एक तर आर्थिक नुकसान आहेच आहे. दुसरे म्हणजे पूजेनंतर ह्या सर्व निर्माल्य/कचऱ्याची विल्हेवाट एक गंभीर समस्या  बनते. पाने-फुले जरी जैवविघटनशील असली तरी ती एक मंदगती प्रक्रिया असते. अल्प काळात छोट्याश्या भूखंडावर किंवा पाण्याच्या साठ्यात टनावारी कचरा येऊन पडला तर त्याचे पद्धतशीर विघटन न होता तो सडत रहातो आणि सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाला धोका निर्माण करतो.  तिसरी आणि मला महत्त्वाची वाटणारी गोष्ट अशी आहे की अट्टाहासाने, पडेल त्या किंमतीत पूजासामग्री विकत घेण्याच्या हव्यासामुळे अशी नैसर्गिक साधनसंपत्ती शहरी बाजारात राशींनी ओतली जाते आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात (अर्थात अवाच्या सव्वा किंमतीला)ती आपल्या गळ्यात बांधली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या टहाळ्यांची छोटी मोळीच विकत घ्यावी लागते कारण वीसपंचवीस पाने रुपया दोन रुपयांना विकणे विक्रेत्याला परवडत नसते. तीच गोष्ट शमी, दूर्वा, आघाडा इ. पत्रीची. अश्या कित्येक वनस्पती गरजेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात रानापठारांतून ओरबाडल्या, उपटल्या जात आहेत. बरे आपले महत्त्वाचे  बहुतेक सगळे सण श्रावण, भाद्रपद, आश्विन महिन्यांत, की जेव्हा या वनस्पतींचे पुष्प-फल-बीजधारणाचक्र पूर्ण झालेले नसते. अशा वेळी त्या मुळापासून उखडल्या गेल्या तर प्रजननाची साखळीच तुटते. यामुळे मोठ्या शहरांनजीकची राने उजाड होत चालली आहेत. हा जैवविविधतेचा ऱ्हास मला चिंताजनक वाटतो.

लेख कदाचित जुना असावा पण आशय ताजाच आहे त्यामुळे तांत्रिक चुकीने इथे अवतरला गेला असला तरी ठीकच आहे.