मित्रा प्रदीप!
छान आहे तुझी ही गझल!
पूर्वीचे दिवस आठवले!
बऱ्याच दिवसांनी तुझी गझल वाचण्याचा योग आला.
खूप बरे वाटले. आनंद झाला.
तुझी ही गझल वाचता वाचता आमच्या मनात खालील शेर उफाळून आले.
पहा कसे वाटतात ते..................
तुलना वगैरे नाही रे बाबा!
काही कुठे चुकत असल्यास जरूर सांग, म्हणजे आम्हास काही शिकता येईल.
आम्हास स्फुरलेले तुझ्या गझलेवरील शेर खालीलप्रमाणे........

तोल किंवा ताल मज सांभाळताही येत नाही!
एक नाते टाळता, कवटाळताही येत नाही!!

आज जो तो एकमेकांनाच ओवाळीत आहे......
मी असा, ज्याला कुणा ओवाळताही येत नाही!

काय धूसर जाहले नाते तुझ्यामाझ्यातले हे?
वाचताही येत नाही! चाळताही येत नाही!

ती तुला, अन् ही मला; या वास्तवाच्या दोन बेडया!
येत नाही धावता, रेंगाळताही येत नाही!!

झोपल्या कायेस माझ्या श्वास चेष्टेने म्हणाले......
झोपतो कुठले, अम्हा कंटाळताही येत नाही!

तेज इतके लकलके की, लोचने दिपतात माझी!
अंतरावरुनी तुला न्याहाळताही येत नाही!!

लाट मी आहे, उसळणे हाच आहे धर्म माझा!
टाळता नाही कुणा, फेटाळताही येत नाही!!

भाबडे कोणीच आता राहिले गावात नाही....
सूज्ञ लोकांना तसे गुंडाळताही येत नाही!

आमचे अस्तित्व आहे एवढे विस्तारलेले....
सोसताही येत नाही! टाळताही येत नाही!

माझियापाशी न काही, रूप नाही, रंग नाही;
गंध आहे मात्र मज गंधाळताही येत नाही!

या तुझ्या मदिरालयाला काय रे उपयोग माझा?
उसळणे सोडा, मला फेसाळताही येत नाही!

...........प्रा.सतीश देवपूरकर