उभ्या महाराष्ट्रात किंबहुना देशातही शरद पवार हा एकमेव नेता असा आहे की त्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक भान पक्के आहे आणि समज दांडगी आहे. त्यांच्याइतका द्रष्टा मनुष्यही दुसरा कोणी दिसत नाही.

एक पु̮̮.ल.देशपांड्यांनी त्यांना एक अनावृत पत्र वर्तमानपत्रातून लिहिले काय आणि सारा बुद्धिवादी महाराष्ट्र त्यांच्या विरोधात गेला काय. एकदा एक विवक्षित उंची गाठली की त्या उंचीवर सतत रहाणे कोणालाही अवघड असते आणि त्यापुढे जाऊन अधिकाधिक उंची गाठण्याची लोकांची अपेक्षा पूर्ण करणे त्याहूनही अवघड. पाठीतला खंजीर, भूखंडाचे श्रीखंड, लवासा या प्रकरणात त्यांची भरपूर बदनामी आणि यथेच्छ टिंगलटवाळी झाली. प्रसंगी कमरेखालचेही वार झाले पण त्यांनी विरोधकांना उद्देशून एकही अनुचित शब्द कधी उच्चारला नाही. महिला, दलित यांच्या बाबतीत त्यांची भूमिका नेहमी पुरोगामीच राहिली आहे. देव,धर्म, अंधश्रद्धा या बाबतीतही तेच.

लवासा नावाचे सुंदर स्वप्न त्यांनी पाहिले आणि आम्ही मात्र त्याचा पूर्ण विचका करायच्या बेतात आहोत. आज मुंबईनजिकच्या एकेकाळी सुंदर, निसर्गरम्य अशा कर्जत, नेरळ, बदलापूर, असनगाव, पार शहापूर-पालघर पर्यंतच्या परिसराची कशी बकाल अवस्था होते आहे हे पाहिले तर नियोजनबद्ध नगरनिर्माणाची आवश्यकता अधिकच ठसते. महाबळेश्वर, माथेरान ही स्थळे एकेकाळी केवळ श्रीमंतांची मिरासदारी होती. आज ती निम्नमध्यमवर्गाच्या आवाक्यातली झाली आहेत. संकल्पित आराखड्यानुसार जर लवासा पूर्ण झाले तर ते पुणेपरिसरातल्या वाढत्या वस्तीला आकर्षित करू शकणारे एक केंद्र ठरू शकते.

खूप लिहिण्यासारखे आहे. पण मूळ लेख शरद पवारांवर नाही. त्यामुळे अवांतर होईल.