जिरे घालायचे झाल्यास घालू शकतो पण आमच्याकडे आम्ही शक्यतोवर टाकत नाही. प्रश्न असा आहे की साबुदाण्याचे मिश्रण तयार झाले की आच बंद करून मग यात जिरे टाकू शकतो पण जिरे टाका, मिश्रण ढवळा, पातेले उचलून मेणकापडापर्यंत (जे टेरेसवर किंवा गच्चीत टाकलेले असते ऊन लागावे म्हणून) घेऊन जा आणि मग डावाने अख्खे मिश्रण संपेतो गरम राहील अशा बेताने पटापट टाकून पसरवत जा.. खूप व्याप आहे. जिऱ्याचा मुख्य प्रश्न हा आहे की इतक्या कढत मिश्रणात ते टाकले की काळे पडण्याची दाट शक्यता असते आणि मग असे काळे पडलेले जिरे, तळलेल्या पापडीत 'रंगमे भंग' टाकते. वेळेचे गणित अचूक जमवून, जिरे काळे न पडू देता पापड्या टाकणे ही एक तारेवरची कसरत आहे असे मला वाटते.