वेदश्री....
तू आणि मी ह्या पुस्तकांच्या 'योग्य' नावाच्या मुद्यावरून डोके फिरवून घेणार हे नक्की. माझ्याकडे 'स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याचा मागोवा' हे कॉंटिनेंटलचे 'शोध पुस्तक' आहे, ज्यावर म. द. हातकणंगलेकर, पुष्पा भावे, निर्मलकुमार फडकुले आणि अन्य अशी भरभक्कम नावे असलेली मंडळी 'संपादक' म्हणून काम करीत असल्याचा उल्लेख आहे. याच पुस्तकाच्या 'मराठी कादंबर्री : प्रवृत्ती आणि प्रवाह' या प्रकरणात पान क्रमांक १९७ वर अनुक्रमे स. शं. देसाई यांच्या 'चंबळेच्या पलिकडे' आणि कॅप्टन बेलवलकर यांच्या कादंबरींचे उल्लेख आहेत.... आणि बेलवलकर यांच्या कादंबरीचे नाव प्रिंट केले गेले आहे "अटकेत रोविले झेंडे" असे... तेही जाड ठशात.
आता तू ते 'अटकेत... ' असे नसून 'घटकेत' आहे असे म्हटलेस म्हणून परत शोध करून त्याची खात्री करून घेतली आणि तुझेच बरोबर निघाले. पण हा गोंधळ करणारी मंडळी तर फारच थोर आहेत.... त्याना आता कोण आणि कसा जाब विचारणार ?
"संगत नरहरची" मला माहीत असायचे कारण म्हणजे मधू करंदीकर ते लिहित असल्याची बातमी मला एकदोन वर्षापूर्वीच नांदेडच्याच एका साहित्यप्रेमी मित्राकडून समजली होती. पण अद्यापि ते हाती आलेले नाही.
श्री. नरहर कुरुंदकर सरांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे..... अगदी तासापेक्षा जास्त वेळ त्यांच्याशी इथे कोल्हापुरात गप्पाही झाल्या आहेत. भाषाप्रभुच म्हणावे लागेल त्याना.... लिखाणातील प्रत्येक शब्द म्हणजे खणखणीत नाणेच जणू.
ह्या पुस्तक ओळखा कोड्याच्या निमित्ताने जुन्या आठवणी फेर घालून नाचत आहेत अगदी... आनंददायीच सारे.