फार स्फूर्तीदायी असे हे अनुभवी लिखाण, जे सविस्तररित्या तर मांडले गेले आहेच शिवाय "चालणे म्हणजे काहीतरी अचाट आहे त्यामुळे मी ते करीत नाही... ' अशी समजूत करून घेऊन या अत्यंत सोप्या तसेच बिनखर्चाच्या व्यायामाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी एक उत्तम धडा आहे.

मी आज साठीच्या घरातील असून रोज किमान १२ किलोमीटर चालत असतो.... तेही कोणत्याही बाजारकामासाठी वा घरगुती कारणासाठी नव्हे तर निखळ 'चालत राहून तब्येत ठीक ठेवणे' या कारणासाठी. पहाटे काही कारणास्तव चुकले तर सायंकाळी न विसरता तितका कोटा पूर्ण करणे क्रमप्राप्त मानले आहे मी.

वर लेखकाने पुणे परिसरात त्यानी "पायाखाली" घातलेली अनेक रोचक वाटू शकणारी उदाहरणे दिली आहेत. ती वाचताना मला माझेच यासारखे एक उदाहरण आठवले. मी कोल्हापूरात राहतो तर मुलगा, त्याची पत्नी आणि एक अपत्य यांच्यासह पिंपळे गुरव, सांगवी इथे राहतो. मी महिन्यातून एकदा [सेकंड किंवा फोर्थ सॅटरडेची सुट्टी पकडून] त्यांच्याकडे जात असतो. मध्यंतरी शेतकरी आंदोलनामुळे 'टोल नाका बंद' प्रकार कोल्हापूर-पुणे रस्त्यावर घडला होता. त्यामुळे एस. टी. आणि हजारो वाहने त्या नाक्यांवर तासनतास अडकून पडली होती. माझी बस जी रात्री ८ वाजता स्वारगेटला पोचणार होती, ती पहाटे ३ वाजता पोचली. बॅग घेऊन गेटच्या बाहेर आलो तर समजले की पी. एम. टी. सेवा ५.३० ला सुरू होते. रिक्षावाल्यांना 'पिंपळे गुरव सांगवी' विचारणे शक्यच नव्हते.

या अगोदर मी आकुर्डी रेल्वे स्टेशन तसेच पिंपळे गुरव असा बसने प्रवास केला असल्याने स्वारगेटपासूनचा शेवटच्या स्टॉपचा मार्ग  कसा आहे हे मला चांगले माहीत झाले होते. पहाटे ३.३० होत आले आणि मला स्वारगेटवर बसवेना, तेव्हा निर्णय घेतला की जायची चालत पिंपळे गुरव सांगवी पर्यंत. किती होईल अंतर ? तर जास्तीतजास्त २० किलोमीटर. आपण तर दररोज १०-१२ किमी चालतोच, तेवढी सवय आहे पायाला... शिवाय पहाटेची थंडगार वेळ असल्याने दमछाकही होणार नाही याची खात्री होती. प्रश्न होता तो लगेजचा. छोट्या नातीसाठी काही खेळणी तसे कोल्हापुरी खाणेही भरपूर होते बॅगेत, शिवाय सूनबाईंसाठी काही पुस्तकेही. तशी जड वाटत होती बॅग.... पण टाकली पाठीवर आणि चालू लागलो.

स्वारगेट ते सारसबाग तसेच अप्पा बळवंत चौकापर्यंत काही वाटले नाह. पण शनिवार वाडा परिसर एकदम सामसूम... पोलिस व्हॅनही नाही. इतके 'थंडगार' झालेले पुणे पाहून फार मजा वाटू लागली. कुत्रीही नाहीत [कोल्हापूरात नाक्यानाक्यावर बेवारशी कुत्र्यांच्या दंगलीची मला सवय असल्याने पुण्याच्या रस्त्यावरील ती नीरव म्हणावी अशी शांतता हवीशी वाटू लागली.]
पूल ओलांडला, कार्पोरेशनचे कार्यालय आले, आणि पुढे मग विद्यापीठ रोड लागल्यावर वर्तमानपत्रांचे एजंट किरकोळ विक्रेत्यांना अंकांचे वाटप करतानाच्या बैठका जागोजागी दिसू लागल्यावर काहीशी जाग दिसली आणि मग मात्र मी एकटेपण विसरून गेलो आणि मोबाईलवरील गाणी ऐकत मस्तपैकी विद्यापीठ, खडकी, औंध आणि मग अखेरीस सांगवी फाट्यापर्यंत आलो... त्यावेळी ७.३० वाजले होते. फाटा ते पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकापर्यंतच्या प्रवासाचेवेळी तर रस्ता दुचाकी चारचाकीनी भरून वाहू लागला होताच. ८ वाजता मुलाच्या अपार्टमेंटमध्ये पोचलो. घाम बिल्कुल आला नव्हता.... मुलगा आणि सूनबाईला मी स्वारगेटपासून लगेजसह चालत आलो आहे हे सांगण्याची काही आवश्यकता वाटली नाही, कारण त्यांचा त्यावर विश्वास बसणे कठीण होते. माझा अवतारही 'दमून आला आहे गडी... ' असा दिसतही नव्हताच म्हणा.

असे अनेक अनुभव घेतले आहेत.... आणि चालण्यात किती गंमत असते हे ते करणाऱ्यालाच माहीत पडेल.

एका चांगल्या लेखाबद्दल श्री. देवी यांचे अभिनंदन.