या सगळ्या 'चलैय्यां'च्या (खवैय्याच्या धर्तीवर) मांदियाळीत रोजच्या तीनचार किलोमीटरचे काय कौतुक! पण प्रसंगोपात्त काही किलोमीटर अधिकची चाल झाली आहे. वैष्णोदेवीची जाऊन येऊन २८ किलोमीटर पदयात्रा, तीसुद्धा घोड्यांच्या टापांखाली येण्याआधी एकदा वैष्णोदेवीदर्शनाचा टिळा लावून घ्यावा अशी (जिवाच्या) आकांताने केलेली, किंवा आपली अगदी सोप्पी अशी ड्यूकच्या नाकाडाची चढाई, किंवा आजूबाजूच्या छोट्याछोट्या टेकड्या, (अलिबागजवळचे कुणकेश्वर, वसईजवळचे तुंगारेश्वर, लेण्याद्री इत्यादी आणि तत्सम) आणि नेमेची येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नेमेची बंद पडणाऱ्या लोकल गाड्यांमुळे अधूनमधून पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून घडलेली दहाबारा कि. मी. ची वर्षायात्रा, इतकीच आमची पुंजी. नाही म्हणायला वयाच्या ऐन भाविकतेच्या शिखरकाळात तथाकथित जागृत देवस्थानांसमोर लागलेल्या चार-पाच कि. मी. लांबीच्या रांगांमधले बहुतेक अनवाणी, कारण मंदिराच्या जवळ पोचल्यावर पादत्राणे ठेवण्यासाठीच्या चेंगराचेंगरीत सापडणे नको म्हणून; असे पदभ्रमण ही अधिकची कमाई.
पण चालण्याने तणाव निघून जातो, प्रसन्न वाटते हे खरे.
लेख अर्थातच आवडला आणि त्यावरचे विशेषतः श्री. पाटील यांचे प्रतिसादही आवडले, हे वेसांनल.