"...इकडे बसमध्ये 'नक्की कुणाची चूक' यावर तुंबळ रणकंदन माजले.... "

~ लतापुष्पा याना लाभलेल्या या रणकंदनाचे मासले अनेकांनी भोगलेले असतात, विशेषतः जे गाडी तर ठरवितात आनंदाने, पण त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तांत्रिक बाबीबाबत ड्रायव्हर वा एजंट यांच्या शब्दांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात त्यानी.

कर्नाटक गोवा सीमारेषावर तैनात असलेल्या आरटीओच्या फौजेस 'मराठी दुफळी'चे असले नमुने माहीत असल्याने ते "एम. एच. ' गाडी दिसली की बिनधास्त शिट्टी फुंकतात. मग तिथून सुरू होतो तो कागदपत्रांबाबतचा 'तू-तू-मै-मै' नामक खो-खो.

आमची शेवटच्या वर्षातील ३५ विद्यार्थी आणि २ प्राध्यापक आणि २ शिपाई अशी एक सहल खास बस घेऊन बंगलोरला चालली होती आणि रात्री दहाच्या सुमारास हुबळी इथे अडविली गेली. ड्रायव्हर आणि त्याचा जोडीदार कागदपत्रांची बॅग तसे शंभराया दोन नोटा घेऊन गाडीतून उतरले.... ते उतरले खरे, पण पुन्हा वर चढण्याचे नावच घेईनात. तासदोन तास होऊन गेले, दोन प्रा. मंडळीहे उतरून त्या अधिकाऱ्यांच्या जीपकडे गेले. आम्ही चार लीडर विद्यार्थीही मग गेलो. इकडे गाडीत मुलीही अस्वस्थ झाल्या. बसची कागदपत्रे तर होतीच याची खात्री मी स्वतः केली होती.  'स्टडी टूर' दाखविली असल्याने सर्व मुलांची आयकार्डस आम्ही घेतली होतीच. आरटीओ रोड पास मिळण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि मॅनेजर्सची यादी देणे गरजेचे असते, ती यादी तर टंकून आम्ही कोल्हापुरात आदल्याच दिवशी दिली होते..... मग घोडे कुठे पेंड खात होते ते कळेना.

शेवटी आमच्या प्राध्यापकांनी निर्वाणीचे अस्त्र म्हणून 'आमच्याबरोबर १४ मुली आहेत आणि आता मध्यरात्र झाली आहे. या मुलींना जर आम्ही हुबळी हॉस्टेलवर नेले नाही आणि यांच्या पालकांनी महासंचालकाकडे तक्रार केली तर आम्ही तुमच्या गाडीचा नंबर देणार.... " ही मात्रा काहीशी लागू पडली. मग आरटीओने आमच्या ड्रायव्हरने तसेच बसच्या मालकाने कुठे आणि कसे शेण खाल्ले आहे त्याचा खुलासा केला.

सारे रहस्यमय मूळ होते ते त्या विद्यार्थ्यांच्या यादीत. स्टुडंटस कन्सेशन म्हणून बसला टॅक्स कमी बसतो. पण प्रवास करणारी मुले ही प्राथमिक शाळेतील लागतात. आम्ही तर कॉलेजीअन्स. आम्ही बसचे पैसे फुल रेटनेच भरले होते. पण लालसेपोटी बसच्या मालकाने ड्रायव्हरकडे दिलेली आमची यादी नव्हती तर गावातील एका प्राथमिक शाळेतील ४० मुलामुलींची यादी, ज्यात पोरांवे दाखविलेले वय होते ७ ते १२ या गटातील.... गाडीत तर सारे पूर्ण वय झालेले वाघ आणि वाघिणी.... म्हणजेच खोटी कागदपत्रे दाखवून मालकाने टॅक्स बचावाचा अश्ल्याघ्य असा प्रयत्न केला होता, जो आम्हाला त्रासदायक ठरू लागला. आरटीओने तर गाडी जप्तच करणार असा धोशा लावला. मुलींची स्वतंत्र व्यवस्था करण्याचीही त्याने तयारी दर्शविली. प्राध्यापक जोडीला त्यानी कागदपत्रे न तपासता प्रवास सुरू केल्याबद्दल कानपिचक्याही दिल्या.

लतापुष्पा यानी वर्णन केल्यानुसार अशावेळी बसचा मालक फोनवर अजिबात भेटत नसतो. शेवटी दादापुता करून एक हजारावर सोडचिठ्ठी मिळाली, हुबळीवाल्यांकडून.  पुढचा बंगलोर प्रवास जरी निर्विघ्नपणे पार पडला असला तरी सुरुवातीलाच बसलेल्या त्या वैतागाने ट्रीप काहीशी नासूनच गेली होती.

कोल्हापूरला परतल्यावर त्या बस मालकाला झोडपून काढण्याच्या उद्देशाने विद्यार्थी मित्र गेले त्याच्या कार्यालयात... पण तो वाघोट्या तिथे हात जोडूनच उभा होता...  "चूक झाली.. ‌... झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागतो, पैसेही परत देतो, पण हे प्रकरण पेपरमध्ये देवू नका... इ. इ. आर्जवे.

प्रकरण वाढविण्यातही काही हशील नव्हते. पैसे मात्र परत घेतले... फक्त डिझेलचे दिले. थोडक्यात अनुभव काय शिकलो तर खाजगी प्रवासी बसने प्रवास करायचा झाल्यास सर्वप्रथम हरेक प्रकारची कागदपत्रे गाडीच्या ड्रायव्हरकडे असल्याची खातरजमा करणे आणि मगच ग्रीन सिग्नल देणे.