परत एकदा या निमित्ताने भाषा आणि तिचा वापर ही चर्चा सुरू होते आहे.
पण त्या अगोदर मुळ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.
" जाहिरातींत चाललेली मराठीची मोडतोड " - हा विषय जुनाच आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर आणि तुम्ही स्वतःला मराठीतील एक भाषा जाणकार समजत असाल तर याकडे तुम्ही एक चांगली संधी म्हणून पाहू शकता.
वर्तमानपत्रातील जाहीरातींच्या खाली बारीक अक्षरांत त्या जाहिरात कंपनीचे नांव लिहीलेले असते. त्यांच्याकडे तुम्ही योग्य अशी सुधारणा करून (चांगल्या मराठीतून ती जाहिरात लिहून आणि बदल सुचवून) ती जाहिरात परत पाठवून द्या. म्हणजे फक्त चुका दाखवून न देता, ती कशी दुरुस्त करता येईल तेही सांगा.
परिणाम असा होईल कि, ती कंपनीच तुम्हाला असे काम कराल कां ? असे विचारील आणि चांगली संधी तुम्हांला मिळेल. फक्त मराठीच नाही तर, इतर भारतीय भाषांची पण हीच रडकथा आहे.
(ता. क. - याच प्रकारे काही जणांना चांगली संधी मिळालेली आहे. हे एक दुर्लक्षीत पण चांगले क्षेत्र आहे.)
मुळ प्रश्न असा आहे कि,
१) जे तिथे काम करतात त्यांना अशी चांगली भाषा मुळातून कां येत नाही आणि
२) या जाहिरात कंपन्यांना, या जाहिराती (स्थानिक भाषेतील रूपांतरीत) प्रसिद्ध करण्याअगोदर त्या एका चांगल्या भाषा जाणकाराकडून तपासून घ्याव्यात असे कां वाटत नाही?
-- याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे त्या साठी लागणारा वेळ आणि पैसा यांची कमतरता.
पैकी पैशाची आता समस्या नाही , पण वेळ मात्र कोणी देऊ शकत नाही.
म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे, तुम्ही याचा योग्य फायदा घेउ शकता.
बाकी भाषा समृद्धी हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि तो मनोगतावर पुर्वी पुष्कळ चर्चिला गेला आहे.
सारांशाने असे मला वाटते कि, एखाद्या भाषेतील मुळ शब्द (जो त्या वस्तूचे अगदी सार सांगतो, चपखल वापरला जातो), तो इतर भाषांमध्येही आपोआप जाउन बसतो. (उदा. रूमाल, बाजार हे मुळ अरबी शब्द आहेत. ते आपल्या मराठीत, हिंदीत कसे अगदी मुळ शब्दांप्रमाणे वाटतात आणि वापरले जातात. ). या उलट "मार्केटला जाउन भाजी आणली" हे कानाला रूचत नाही . एक आणखी कारण आहे कि, खूप सरस प्रतिशब्द रचना करून आपण नेमका अर्थ / भावार्थ समोरच्या पर्यंत पोचवू शकतो.
या प्रस्नात भर पडते ती, वाचनाच्या अभावाची!!
भाषा जाणकार म्हणजे वाचन चांगले आणि खूप ऐकणे. पण ते नसल्यामुळे नुसते रकाने भरणे , एवढेच होते.
प्रसाद