आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे व आजूबाजूच्या वातावरणामुळेच आपली विचारसरणी अशी बनलेली आहे.  ती घालवणं कठीण आहे. आपण  सगळे हे जाणतो की परमेश्वर दिसत नाही तरीही त्याच्या नावावर चाललेली सगळी थेरं आपण सहन करतो.  मग निर्गुण निराकार परमेश्वराची कल्पना मनात कशी पक्की होणार ? याला आपलं अध्यात्मही बऱ्याच अंशी जबाबदार आहे. तसच जितकी मतं  तितके मार्ग असे आपल्या धर्माला मान्य असल्याने दुसऱ्याला तुम्ही "तुझे चाळे बंद कर" , असे आपण सांगू शकत नाही. याला एक उत्तर देता येईल. ते म्हणजे नुसती उपासना करून बरोबर अयोग्य दिशेत प्रयत्न करून माणसाला जीवन जगता येत नाही हे सप्रमाण सिद्ध करावे लागेल. तरच  काहीतरी सुधारणा होण्याची शक्यता आहे. निदान आपल्या धर्मात दुसऱ्याचे मत भिन्न असू शकते ही सहिष्णुता तरी आहे , हे काय वाईट आहे अर्थातच आपल्या धर्माला इतर धर्मीय "सैल धर्म " असे म्हणतात. खरंतर आपण या धर्माचे आहोत याचं महत्त्व वाटायला हवं. अंधश्रद्धा या 
भीती मधून निर्माण होतात. त्या नाहीशा करायला भीती घालवावी लागेल. योग्य प्रयत्नानेच यश मिळतं हे बरोबर राहूनच दाखवावं लागेल. 
मग काही सुधारणा झाली तर होईल. कदाचित आपल्याला नक्की  ज्ञान आहे ते कळू  नये, आणि मूठभर लोकांचे स्वार्थ जपले जावे म्हणुनच 
ही कर्मकांड निर्माण केली असावीत , असा मला कधी कधी संशय येतो. आपल्याला सुधारायचे असेल तर इतर धर्मांकडे पाहण्यात अर्थ नाही. त्यांच्यातही आपल्यासारखीच अंधश्रद्धा भरलेली आहे. आधी आपण न दिसणाऱ्या परमेश्वरावर प्रेम करायला शिकण्यापेक्षा , समोरच्या जिवंत 
माणसांवर प्रेम केलं तर बरं होईल. तेव्हा चित्रपटांना हरकत घेतली काय आणि नाही काय आपल्या समाजावर आणि त्याच्या समजावर काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाने आपापल्यापुरतं जागृत  व्हावं हे बरं.  त्यामुळे अंनिसचं कार्य फारसं उपयोगी पडेल असे वाटत नाही. आम्हाला मुळी 
डोळ्यावर झापडं घालूनच वावरायचंय.