आपण जर नीट चौकशी केली तर आपल्याला असे आढळून येईल की, श्रीशंकराचार्यानी या चारच्या चारही पीठांवर मुख्य पुजारी म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूरकडच्या देशस्थ ब्राह्मणांची योजना केली होती.

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठांचे पहिले अधिपती (स्वतः शंकराचर्यांनी नियुक्त केलेले) असे  १. (जगन्नाथ) पुरीचे गोवर्धन पीठ - पद्मपादाचार्य, २. द्वारका पीठ - हस्तामलकाचार्य , ३. बद्रीनाथच्या ज्योतीमठ पीठाचे तोटकाचार्य  आणि ४. शृंगेरी मठाचे - मंडनमिश्र.
वरीलपैकी कोणीही कोल्हापूरकडचे देशस्थ ब्राह्मण नाही.
लेखकाने मठाधिपती नाही, पुजारी म्हटले आहे असा कोणी मुद्दा काढला तर त्या पुजाऱ्यांची नावे/संदर्भ लेखकाने द्यायला हवे होते. निदान जालावर मिळत नाहीत.

 यांना कोणती भाषा समजू शकेल? तर राष्ट्रभर संपर्क-भाषा म्हणून प्रचलित असलेले मराठी भाषेचे 'प्राकृत' हे नाव धारण करून असलेले तिचे पूर्वरूपच.

हे विधान चांगलेच दिशाभूल करणारे आहे. प्राकृत नावाने ओळखल्या जाणाऱ्या निदान १५-२० भाषा आहेत. देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्राकृत भाषा बोलल्या जात. त्यापैकी महाराष्ट्रात बोलली जाणारी महाराष्ट्री ही मराठीची आई.  शौरसेनी पासून खडी बोली हिंदी आणि पंजाबी उत्पन्न झाल्या तर मागधीपासून बंगाली, आसामी, उडिया तसेच भोजपुरी, मैथिली वगैरे भाषा उत्पन्न झाल्या. त्यामुळे पूर्वी देशभर "प्राकृत" नावाने एकच भाषा आणि तीही मराठीच,  बोलली जायची हे म्हणणे योग्य नाही.
आणखी एक मुद्दा असा की मराठीचा पहिला उल्लेख श्रवणबेळगोळच्या "चामुण्डराजे करवियले" या शिलालेखाचा. तो साधारण इ. स. १०१८चा समजला जातो. त्यापूर्वी भारतभर मराठी बोलली जात होती म्हणणे पटण्यासारखे नाही.
वरदाने उल्लेख केला नाही, पण मूळ लेखात आणखी एक चूक आहे. रुक्मिणिस्वयंवर हे काव्य एकनाथांनी लिहिले असे म्हटले आहे ते चुकीचे असून
 ते नरेंद्राने लिहिले आहे. हा नरेंद्र ज्ञानेश्वरांच्यानंतर लगेच होऊन गेला (कदाचित समकालीनही असेल).
एकूणात असंख्य, चुका, अतिशयोक्ती, खोटा अभिनिवेश यांनी भरलेला हा लेख आहे. त्याला जास्त महत्त्व देऊ नये.

विनायक