तर मग अध्यक्षनिवडीवरून वाद का होतात?   कोणात वाद होतात? वाद पूर्णपणे त्या संस्थेला इंटर्नल असतात. बहुतेक संस्थांना सार्वजनिक चेहेरा नसतो. मी IWRS,  म्हणजे "इंडियन वाटर रिसोर्सेस सोसायटी" या संस्थेचा सभासद आहे. या संस्थेला काहीही सार्वजनिक चेहेरा नाही. आमच्यात पण वाद होतात. पुढच्या वर्षी अध्यक्ष कोणाला करावे; या वर्षीचा "जल संसाधन दिवस" हा कार्यक्रम कोणत्या सभागृहात घ्यावा; विषय काय असावा; इत्यादी. पण आम्हाला कोणताही  सार्वजनिक चेहेरा नसल्याने आमच्यातील वाद चव्हाट्यावर येत नाहीत, तुम्हाला दिसत नाहीत. मसाप, बीसीसीआय, या अश्या संस्था आहेत ज्यांना एक सार्वजनिक चेहेरा आहे.  म्हणून त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर मांडले जातात, आपल्याला दिसतात. (जसे, अमूक सिनेनट तमूक मॉडेल बरोबर "हिंडत" आहे, या वर आपण चर्चा करतो, तसेच. आमच्या शेजारचा चंदू कोण बरोबर हिंडतो आहे, यात कुणाला इंटरेस्ट आहे?) मग आपण पण त्या वादात आपली मते मांडू लागतो. हे विसरून कि आपले मत कोणीही विचारलेले नाही, व त्याला काहीही किंमत नाही. विरंगुळा म्हणून कोणीही कशावर ही मत मांडू शकतो. पुढच्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्रपती कोण व्हावा  या वर तुम्ही लेख लिहू शकता, मी त्या वर प्रतिक्रिया लिहू शकतो, चर्चा होऊ शकते. पण अमेरिकेतील नागरिकांना त्या चर्चेची काहीही किंमत नाही.

सरकारने अनुदान द्यावे / न द्यावे यावरून वाद का होतात?  कारण इथे आपण सर्व नागरिकांना कायद्याच्या भाषेत ज्याला "लोकस स्टॅंडाई" म्हणतात, ते आहे. शासन तुम्ही-मी-आपण दिलेल्या करातून अनुदान देणार असते. म्हणून आपण कर रूपातून शासनाला दिलेले पैसे शासनाने कसे वापरावेत, या बाबत तुम्हाला-मला भाष्य करण्याचा  अधिकार आहे, व आपल्या मताला किंमत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मसापला खुशाल कोटी कोटी रुपये द्यावेत, आम्हाला त्याचे काहीही सोयर-सुतक नाही.

संमेलन भरवावे / न भरवावे / कुठे भरवावे यावरून वाद का होतात?   अध्यक्ष निवडीच्या वादा प्रमाणे हा वाद पण पूर्णपणे मसपाला इंटर्नल असतो. मात्र १- संस्था खाजगी असली तरी संस्थेला सार्वजनिक चेहेरा आहे, व २- आता आपण हे गृहित धरतो कि हे शासनाच्या अनुदानातूनच होणार आहे. जर मसाप म्हणाले कि आम्ही कर दात्यांचा एक पैसा पण न घेता आमच्या पैश्यातूनच सर्व खर्च करणार आहोत, तर त्यांनी सम्मेलन लास वेगास येथे घ्यायचे ठरविले,  तरी त्या वर टीका करणारे तुम्ही -मी कोण ? 

याच धर्तीवर विचार करता बीसीसीआय ही देखील एक बिगरसरकारी सामाजिक संस्था आहे मग तिचे खेळाडू क्रिकेट मध्ये जिंकल्यावर, भारत जिंकला असे म्हणत फटाके वाजवित आनंदोत्सव साजरा करणे हा देखील भाबडेपणाच ठरावा.    बीसीसीआय ची टीम ही भारताची टीम नव्हे. त्यामुळे "भारत जिंकला" असे म्हणने भाबडेपणाचेच आहे.  आणि हे मत केवळ माझे नाही तर अनेक विचारवंतांनी मांडले आहे. मात्र, भारत जिंकला असे म्हणणे, व भारतीय जिंकले असे म्हणणे, यात फरक आहे. लिएंडर पयेस जेव्हां डेविस कप मध्ये खळतो, तेव्हां  तो भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. पण तो जेव्हां विंबेल्डन मध्ये खेळतो, तेव्हां तो वैयक्तिक पातळी वर खेळत असतो. विंबेल्डन मध्ये तो जर जिंकला
तर एक भारतीय जिंकला याचा आनंद मला होणे, तो व्यक्त करणे, यात वावगे काहीही नाही. पण त्याला "भारताचा विजय" म्हणणे चुकिचे ठरेल. पण क्रिकेट प्रेमी लॉजिकल असतात हे तुम्हाला कोणी सांगितले?