"मी कशाला काय बोलतोय? मी आपला पिंडाएवढा भात खाईन आणि मढ्यासारखा पडून राहीन. "

मीरा, 
नाऱ्या काय म्हणाला ते तुम्ही अर्धवटच सांगितले. पूर्ण वाक्य आहे,  " "मी कशाला काय बोलतोय? मी आपला पिंडाएवढा भात खाईन आणि मढ्यासारखा पडून राहीन. मांडवाला आग लागली तरी बोंबलणार नाही"   असो. काही लोकांना बोलण्याचा पोच नसतो. खाली दिलेला संवाद आमच्याच घरात घडलेला आहे.   मी नुकताच बी टेक झालो होतो व जल-अभियांत्रिकी क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती. आमचे एक ओळखीचे गृहस्थ होते, त्यांचा एक लहानसा बंगला होता. त्यांना घरी बोअर टाकून हवे होते. तर, एक दिवशी सकाळी ते आमच्या घरी आले व "वदते" झाले.

"अरे चेतन, माझे एक काम कर बाबा. आमच्या कडे कार्पोरेशनचे पाणी  पुरेसे येत नाही, म्हणून मला एक बोअर टाकून हवे आहे. पण मला तर त्यातले टेक्निकल काही कळत नाही. मला माहीत आहे कि तुझी नवीन नोकरी आहे व तुला वेळ नसतो. म्हणून मी त्या देशपांडे कडे गेलो. ते रेल्वेत इंजीनियर आहेत. ते म्हणले कि तुम्ही काही काळजी करू नका,  मी रविवारी बोअर टाकणारा घेऊनच येतो, व तुमचे काम करून टाकतो. पण रविवार गेला, ते काही आले नाहीत. म्हणून त्यांच्या घरी फोन केला तर कळाले कि दोन दिवसां पूर्वी त्यांना हार्ट ऍटॅक आला व ते गेले. आता काय करायचे?

मग कोणी तरी सुचविले कि ते परांजपे, पीडबल्यूडीतले, ते पण या विषयात जाणकार आहेत.  म्हणून मग मी त्यांना रिक्वेस्ट केली. ते म्हणले हो, त्या देशपांडेच ऐकून धक्काच बसला. पण काय इलाज. असो. मी तुमचे बोअर चे काम आठ-दहा दिवसात करून देतो. आणि कालच कळाले कि त्यांच्या स्कूटरला अपघात झला व ते जागच्या जागीच गेले.

मल कळत नाहीये कि हे काय होऊन राहिले आहे?  माझी बोअर  करणारा जगत का नाही? देशपांडे करतो म्हणले, दोन दिवसात हार्ट ऍटॅकने गेले;  परांजपे करतो म्हणले, दुसऱ्याच दिवशी स्कूटर अपघातात गेले. जो माझी बोअर करून देण्याचे म्हणतो, तो चार दिवसां पलीकडे जगतच नाही. आता तूच एक उरला आहेस. तू तरी माझी बोअर करून दे".