‘‘ब्रिटिश हे ख्रिश्चन असल्याने भारतातील कॅथलिक समाज इतर समाजांसारखा मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाला नाही,’’ असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया :- शेट्टी यांनी आपले मूळ विधान फिरवून, ख्रिश्चनांऐवजी आता कॅथलिक असा बदल केला आहे. त्यामुळे त्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. वास्तविक ब्रिटिश हे प्रॉटेस्टंट (अँग्लिकन) होते आणि त्या काळी कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यात विस्तव जात नव्हता. म्हणजे शेट्टींची समीकरणे ग्राह्य़ धरायची तर, कॅथलिकांनी त्यांना विरोधच करायला हवा होता! धर्माच्या नावाने नव्हे तर राष्ट्रप्रेमामुळे ख्रिस्ती लोक स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले होते. राजकीय विधान करताना आपण काय बोलतो याचे भान शेट्टी यांना राहिलेले दिसत नाही. सर्वच ख्रिस्ती लोकांनी भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले आणि आठवे (१८८५ व १८९२) अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिस्ती होते. ख्रिस्तोदास पाल यांनी १८७४ साली ‘हिन्दू पेट्रिऑट’ या नियतकालिकात लेख लिहून भारतात होमरूल लीगची मागणी केली. कालीचरण बॅनर्जी यांनी १८८७ साली स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘कलकत्ता ख्रिस्तो समाज’ची स्थापना करून, ब्रिटिशांशी संघर्ष केला. दक्षिण भारतातील ख्रिश्चनांनीसुद्धा ब्रिटिशांना विरोध केला होता.
मिशनऱ्यांनी काढलेल्या शाळांमुळे, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीयांना अमेरिकन, फ्रेंच, आयरिश स्वातंत्र्यलढ्यांशी ओळख झाली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला खतपाणी घातले गेले, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही.
गोपाळ शेट्टी यांचा महाराष्ट्राचा इतिहासही कच्चा दिसतो. उत्तन (भाईंदर) येथील बॅरिस्टर जोसेफकाका बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते. ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळविणारच’ या घोषवाक्याचे ते जनक होते. त्यांनी लोकमान्यांचे आणि हिंदुत्व-विचाराचे प्रवर्तक स्वा. सावरकर यांचे वकीलपत्र घेतले होते. लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याच्या कल्पनेला त्यांचा पाठिंबा होता. शेट्टींच्या माहितीसाठी, ते कॅथलिक होते. वसईतील कॅथलिकांनीही स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. निर्मळ येथील समाजसेवक स्व. जोसेफ दालमेत यांचे आजोबा इतूर ऊर्फ काल्या दुमा दालमेत हे ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत वसईतील कॅथलिकांनी लाठ्याकाठ्या खाऊन तुरुंगवास भोगला आहे. पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या हरित वसई आंदोलनात येथील कॅथलिक आघाडीवर होते.
जात, धर्मावरून उणीदुणी काढून समाजात गैरसमज पसरविण्याऐवजी एकदिलाचा संपन्न, सबळ भारत निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याची आज नितांत गरज आहे. (फा. फ्रान्सिस दिब्रिटो, गिरीज, वसई)