व्यक्ती असा घेतला जातो पण सिद्ध ही स्थिती आहे. ती इतकी प्रत्यक्ष आहे की तिला इतर कोणत्याही पुराव्याची किंवा प्रमाणाची गरज नाही. म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध करायला वाद-प्रतिवाद व्हायला लागतो, साक्षी-पुरावे लागतात आणि मग ती सिद्ध होते; मग तो वैज्ञानिक सिद्धांत असो की गणितातलं प्रमेय असो; पण अध्यात्मात सिद्ध ही आरंभीची आणि कायमची स्थिती आहे !

आपल्याकडे सिद्ध हा शब्द व्यक्तीशी जोडल्यामुळे ती काही तरी विशेष, अलौकिक गोष्ट आहे असं वाटतं; पण ती सर्वसामान्य वस्तुस्थिती आहे. शिवाय सिद्धी ही अत्यंत भंपक कल्पना सिद्धत्वाशी जोडली गेली आहे.  अमक्यानं इकडची भितं तिकडे नेली, तमक्यानं पाण्यात दिवे पेटवले;  गेलेला माणूस उठला आणि त्यानं ग्रंथ लिहिला; अशी काय वाट्टेल ती ठोकाठोकी शतकानु शतकं चाललेली आहे. या प्रकारामुळे अध्यात्माचं आणि विज्ञानाचं निष्कारण आणि कायमचं वितुष्ट निर्माण झालं आहे. वास्तविक, विज्ञान घटनेच्या किंवा प्रक्रियेच्या कार्यकारणाचा  उलगडा करणारं शास्त्र आहे आणि अध्यात्म ज्या अवकाशात त्या घटना किंवा प्रक्रिया घडतायंत त्याचा वेध घेणारं विज्ञान आहे;  तस्मात, त्या दोन्हीत कोणत्याही वितुष्टाचा प्रश्नच येत नाही.